sugarcane rate protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sugarcane Prices : शेतकऱ्यांसाठी भाजपचे माजी आमदार उतरले मैदानात, तीन कारखान्यांविरोधात दंड थोपटले

Pradeep Pendhare

Ahmednagar News : साखर कारखाना चालकांनी उसाचा दर जाहीर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारी नेवासा तहसील कार्यालयात कारखानदार, शेतकरी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक होत आहे. उसाला किमान तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळावा, अशी मागणी आहे. परंतु कारखान्यांकडून 2500 ते 2800 रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. त्यामुळे ही बैठक हॉट होण्याची शक्यता आहे.

नेवासा तालुका आणि आजूबाजूच्या परिसरात 'मुळा', 'ज्ञानेश्वर' आणि 'गंगामाई' कारखाना येतो. या तिन्ही कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान पहिली उचल 3 हजार 100 रुपये द्यावी, अशी मागणी आहे. यामुळे ही बैठक ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, यासाठी या बैठकीत उसासाठी भाव लावून धरणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. शेतकऱ्यांच्या बाजूने भाजप नेते बैठकीत उतरणार असल्याने या बैठकीकडे लक्ष लागले आहे. ( Sugarcane Prices Protest News )

नगर जिल्ह्यात 22 साखर कारखाने आहेत. यात 14 सहकारी साखर कारखाने आहेत. यातील 13 कारखान्यांनी पहिली उचल घोषित केली आहे. परंतु काही कारखान्यांनी उचल जाहीर केलेली नाही. ज्यांनी उचल जाहीर केली आहे, ती 2500 त 2800 रुपयांपर्यंत आहे. याबाबत शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासमोर झालेल्या बैठकीत तक्रार केली होती. जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेऊन दोन दिवसांत कारखान्यांनी दर जाहीर करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या तहसील कार्यालयात बैठक होत आहे. नेवासा तहसील कार्यालयात उद्या बैठक होत असून, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार रुपयांच्या पुढे मिळावी, अशी मागणी केली आहे.

श्रीगोंद्यातील 'गौरी' आणि विखे कारखान्याने तीन हजार रुपयांपुढे पहिली उचल जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर नेवासा आणि परिसरात असलेल्या 'मुळा', 'ज्ञानेश्वर' आणि 'गंगामाई', कारखान्याने उसाला पहिली उचल द्यावी, अशी मागणी असणार असल्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.

नऊ कारखान्यांचे दर जाहीर नाहीत

श्रीगोंद्यातील 'गौरी' कारखान्याने सुरुवातीला उसाला सर्वाधिक उचल दिली. यानंतर विखेंनी तीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केली. 'गौरी'ने सर्वाधिक उचल दिल्याने इतर कारखान्यांची कोंडी झाली. यातच शेतकरी संघटनाने राज्यपातळीवर उसाला भाव मिळावा म्हणून आंदोलनाचा हत्यार उपसले. यात केंद्र सरकारने घालून दिलेल्या 'एफआरपी'नुसार उसाला भाव द्यावा, असा आदेश झाला. तरीदेखील राज्यातील काही कारखान्यांनी उसाची पहिली उचल जाहीर केलेली नाही. यात नगर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी दर घोषित केलेले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT