Sharad Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : ''...तर छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडून 'या' पक्षात यावं !''; कुणी दिली ऑफर ?

सरकारनामा ब्यूरो

Nashik : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पक्ष संघटनेत जबाबदारी मिळावी अशी इच्छा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी व्यक्त केली. यानंतर प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना मिळावं अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. भुजबळ यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही असं बोललं जात आहे. याचदरम्यान, छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे मंगळवारी(दि.२७) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, छगन भुजबळ यांची रास्त भूमिका असून जास्तीत जास्त पदाधिकारी मराठा समाजातील आहेत, भुजबळ नेहमीच शरद पवार यांच्या मागे ताकदीने उभे राहिले. त्यांना जर वाटत असेल की, अन्याय होत आहे, तर छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावं असं आठवले म्हणाले आहेत.

विरोधकांच्या पाटणा (Patana) येथील बैठकीवर आठवले यांनी भाष्य केलं, ते म्हणाले, पीएम नरेंद्र मोदी जगातील एक नंबरचे पॉप्युलर नेते आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी 'एनडीए'चे सरकार येईल. 2024 मध्ये आम्ही 350 पेक्षा जास्त जागा जिंकू असंही आठवले म्हणाले. विरोधक पक्षांना शुभेच्छा असून त्यांनी एकत्र यावं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला जागा मिळावी...

आठवले म्हणाले, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला जागा मिळावी, मित्र पक्षाला जागा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच करत स्थानिक पातळीवर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी बोलवलं पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. मित्रपक्षाला सोबत घेऊन भाजपा जात आहे. 'एनडीए'च्या प्रत्येक मीटिंगला आम्ही जातो. मात्र, महाराष्ट्रात अशा मीटिंग होत नाही. भाजप पक्षाची भूमिका समजून घेतली पाहिजे असंही आठवले म्हणाले.

दंगा थांबला, पण तो झालाच नव्हता....

यावेळी रामदास आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब कबरीवर दिलेल्या भेटीवरही आपली प्रतिक्रिया दिली. आठवले म्हणाले, त्याठिकाणी जाणे अयोग्य आहे. आंबेडकरी चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे, औरंगजेब याला पाठिंबा देणारी नाही. त्याचबरोबर राज्यात कुठेही दंगली झाल्या नाही. हिंदू-मुस्लिम समाजाचा दंगा कुठेही झाला नाही. केवळ पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात वाद झाला. त्यामुळे ते म्हणतात की, दंगा थांबला, पण दंगा झालाच नव्हता असा टोलाही आंबेडकरांना आठवलेंनी लगावला.

...त्यामुळे 'बीआरएस' भाजपची बी टीम नाही !

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बीआरएसवर देखील भाष्य केलं. आठवले म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. तो त्यांचा स्वतंत्र पक्ष असून त्यामुळे बी टीम आहे असं म्हणता येणार नाही. पण तेलंगणात भाजप आणि टीडीपी एकत्र येऊन केसीआर यांची सत्ता घालवण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही. असंही आठवले म्हणाले.

तसेच पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. त्यांना सुद्धा दर्शनाला यायचा अधिकार आहे. मात्र तिथले पावित्र्य राखले जावे, असे आवाहन आहे. मात्र नॉनव्हेज देणे अत्यंत चुकीचे असून पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. खायचे असेल तर त्यांनी तेलंगणामध्ये जाऊन खावं असा सल्लाही आठवले यांनी राव यांना दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT