Shankarrao Gadakh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shankarrao Gadakh News : ''...तर केंद्र आणि राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार !''; ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

विनायक दरंदले

Newasa : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कावर तब्बल ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्षांसह शेतकरी नेतेही आक्रमक झाले आहेत. आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार शंकरराव गडाख यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा दिला आहे.

आमदार शंकरराव गडाख(Shankarrao Gadakh) यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रोजी नेवासे तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी जमा झाले होते. कांदा प्रश्नी सर्वांच्या भावना तीव्र होत्या. तहसीलदार संजय बिराजदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर आमदार गडाख यांचे आवेशपूर्ण भाषण झाले.यावेळी ते बोलत होते.

गडाख म्हणाले, केंद्र सरकार( Central Government) ने कांद्याच्या बाबतीत ४० टक्के निर्यात शुल्कचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांची कडेलोट करणारा असून 'नाफेड' च्या माध्यमातून तीन हजार रुपये क्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर घेऊन रस्त्यावर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

'मुळा' चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी,मोठ्या संख्येने सरपंच, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

...तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही!

शेती व शेतकरी कुटुंबियांच्या जीवनमरणाशी निगडित असलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगून आमदार गडाख यांनी

मागील वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नेवासे तालुक्यातील आठपैकी पाच महसूल मंडलातील शेतकऱ्यांना शासनाने सुरुवातीला घोषणा केल्याप्रमाणे दुप्पट दराने नुकसान भरपाईच्या रकमा अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्या त्वरीत मिळाव्यात अशी मागणी केली.

'' गळ्यात कांद्याच्या माळा...''

राहुरीच्या बाजार समिती समोरच नगर-मनमाड महामार्गावर 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी मोठ्या संख्येने रास्तारोको आंदोलन करत थेट रस्त्यावर उतरले. गळ्यात कांद्या(Onion) च्या माळा घालून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्तारोको करण्यात आला.

या आंदोलनादरम्यान 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत काहीसी झटापट झाली, त्यानंतर 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT