Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : 'एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील’,कुणी केला 'हा' खळबळजनक दावा?

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : विधानसभा निवडणुकीत आमच्या महायुतीच्या बाजूने निकाल लागला.त्यामुळे त्यांना कारण हवं आहे. त्यांच्या बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आणि विरोधात गेला की मशीन वाईट, असा कसा तुमचा निकष आहे.

Deepak Kulkarni

Shirdi News : लोकसभेला निराशाजनक कामगिरी केलेल्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी मागणी उचलून धरत ईव्हीएम प्रणाली असेल तर आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी दर्शवली आहे. यातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्यानं उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) खळबळजनक दावा केला आहे.

एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली.त्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्या पक्षांकडून एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडली जात नाही.अशातच शिंदेसेनेचे तडफदार व आक्रमक नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करतानाच धक्कादायक विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे फायरब्रँड नेते रामदास कदम आपल्या कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. कदम म्हणाले,साईबाबांनी आमच्या महायुतीला मोठा कौल दिला आहे.येत्या दोन दिवसांत आमचं सरकार सत्ता स्थापन करेल.याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

राज्यातील लोकांनी दिवसाचे 18 ते 20 तास काम करणारा मुख्यमंत्री पाहिला. मागच्यावेळी आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी आम्हाला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली.आता तर भाजपचे 133 हून अधिक आमदार स्वतःचे आहे.त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवायला हवं,असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं.

'ठाकरे देश सोडून जातील...'

कदम म्हणाले,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांनी बेईमानी केली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांनी हे पाप केले.त्या पापाचं प्रायश्चित ठाकरेंना घ्यावंच लागणार आहे. तुमच्याकडे लिहून ठेवा, ‘एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील’, हे आपले शब्द आहेत, असा दावा करुन कदम यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

' महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाही...'

एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे.पण भाजपलाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ईव्हीएमवर खापर फोडत असलेल्या महाविकास आघाडीवरही माजी मंत्री रामदास कदम यांनी टीकेची झोड उठवली.ते म्हणाले,ज्यावेळी लोकसभेला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या.त्यांच्या पक्षांचे जास्त खासदार निवडून आले.तेव्हा त्यांनी ईव्हीएम मशिनवर कुठे खापर फोडले का? नाही ना. असा सवालही कदम यांनी उपस्थित केली.

तसेच विधानसभा निवडणुकीत आमच्या महायुतीच्या बाजूने निकाल लागला.त्यामुळे त्यांना कारण हवं आहे. त्यांच्या बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आणि विरोधात गेला की मशीन वाईट, असा कसा तुमचा निकष आहे अशी खोचक टिप्पणीही शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT