Vijay Auti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijay Auti Parner : विजय औटींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा; अतिवृष्टीवरून सरकारची कोंडी

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : नगर जिल्ह्यात दोन दिवस झालेली अतिवृष्टी, गारपीट आणि वादळवाऱ्याने पारनेरसह अनेक तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीवरील उभी पिके आडवी झाली. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी केवळ पंचनामे नकोत तातडीची मदत द्या, असे आवाहन सरकारला केले आहे.

नुकसानीबाबत मागील दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने पीक, फळबागा आणि दगावलेल्या जनावारांचे पंचनामे करण्याच्या सूचना विखे पाटलांनी प्रशासनास दिल्या आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री विखेंनी प्रशासनाकडून जाणून घेतली.

या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. मात्र हवामान खात्याने आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही विखेंनी केले. दरम्यान, माजी आमदार औटींनी मात्र अतिवृष्टीवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

विजय औटी (Vijay Auti) यांनी पारनेर तालुक्यातील निघोज, जवळा आदी अनेक अतिवृष्टी बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधांवर जात नुकसानीची पाहणी केली. तालुक्यात कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अगदी दोन दिवसांवर काढणीला आला कांदा काही तासांत नष्ट झाला आहे. गहू,टोमॅटो, भाजीपाला, फुलशेती बरोबरच पपई, सीताफळ आदी फळशेती अक्षरशः कोलमडून पडली आहे. यातील अनेक फळभाज्यांना पीकविमा लागू होत नाही, यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या परिस्थितीत सरकार पंचनामे करत असले तरी प्रत्यक्षात मदत कधी पदरात पडणार, असा सवाल विजय औटी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी 2022 ला झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची मदत अजूनही 50 टक्के शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हे वास्तव असताना आता पंचनामे ते मदतीचा प्रवास हा चार-पाच महिन्यांचा असेल असे औटी म्हणाले. पपईसारख्या अनेक फळ पिकांना नुकसान भरपाई मिळत नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार ते 30 हजार एकरी तातडीची मदत दिली पाहिजे. पिके, फळे अशी निकष न लावता विशेष बाब म्हणून सर्वांना मुखमंत्र्यांनी मदत द्यावी, अशी मागणी विजय औटी यांनी केली आहे. त्यामुळे केवळ पंचनामे की थेट आर्थिक मदत याकडे नुकसान झालेल्या बळीराजाचे लक्ष लागून आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT