Sanjay Rathod and Devanand Pawar Sarkarnama
विदर्भ

Yavatmal Politics: यवतमाळची आणेवारी 61 पैसे दाखवल्याने शेतकरी नाराज ? तर काँग्रेसचं पालकमंत्र्यांकडे बोट

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील हजारो एकरवरील कपाशी आणि सोयाबीनचे पिके अतिवृष्टीमुळे वाहून गेली, तर शिल्लक राहिलेल्या सोयाबीनवर'येलो मोझॅक' रोग पडल्यामुळे सोयाबीनचे पीक जवळपास संपुष्टात आले, तर सततच्या पावसामुळे शिल्लक राहिलेल्या कपाशीलाही बोंडे लागली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मग असे असतानाही प्रशासनाने यवतमाळ जिल्ह्याची आणेवारी 61 पैसे काढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यावरून काँग्रेसने सरकारवर टीका करत पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागावर यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. "मुळातच पालकमंत्री संजय राठोड सत्तेच्या नशेत असल्यामुळे त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील", असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिला आहे.

जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टर सोयाबीनची लागवड झाली. मात्र, अतिवृष्टीमुळे आणि 'येलो मोझॅक'च्या आक्रमणामुळे हजारो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे सोडून सत्तेचा सारीपाट खेळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

"सरकार सध्या राजकीय टिंगलटवाळी करण्यात मश्गूल आहे, तर दुसरीकडे प्रशासनावर पालकमंत्र्यांची तिळमात्र वचक नसल्याने जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही, अशी परिस्थिती आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकार आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त काढण्याची हिंमत कशी करू शकते", असा प्रश्न देवानंद पवार यांनी विचारला आहे.

नजरअंदाज पैसेवारीत शेतकऱ्यांबरोबर बेईमानी करणाऱ्या सरकारने सुधारित पैसेवारी काढताना वास्तविक स्थितीची जाणीव ठेऊन पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी काढावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देवानंद पवार यांनी दिला आहे.

तक्रारी दाखल करण्याचे देवानंद पवारांचे आवाहन

पन्नास, पन्नास खोके घेणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळूच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या भरोशावर न राहता पीकविमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून नुकसानीची नोंद करावी.

याव्यतिरिक्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी. जेणेकरून तक्रार करूनही मदत न मिळाल्यास न्यायालयात जाता येईल. तक्रारी न केल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहून तक्रारी करण्याचे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT