Nana Patole News
Nana Patole News  Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : ''ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, आणि मविआ नसेल तर...''; पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामा ब्यूरो

Nagpur : राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरुन दावे प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २००४ साली पक्षाच्या जास्त जागा असून देखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही ही खंत बोलून दाखवली होती. तसेच आपण आजही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

याचवेळी उध्दव ठाकरेंनी आघाडीत कुणाच्याही जागा जास्त आल्या तरी राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव शरद पवारांकडे दिल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.

आगामी २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. याचवेळी अजित पवार यांच्या सासूरवाडीसह अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली पोस्टर झळकले आहेत.

याचदरम्यान, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीत कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसलाच देण्यात येईल असा प्रस्ताव दिला आहे. पण याचवरुन आता महाविकास आघाडीत 'वज्रफूट' पडण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर मोठं भाष्य केलं आहे. पटोले म्हणाले, सध्यातरी निवडणुका होणार नाही. त्यांना अजून अवकाश आहे.त्यामुळे मुख्यमंत्री पदावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण महाविकास आघाडी म्हणून आम्हांला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे असंही पटोले यावेळी म्हणाले.

तसेच अजित पवार(Ajit Pawar) मुख्यमंत्री म्हणून मान्य असतील का याप्रश्नावर पटोले म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे की,महाविकास आघाडीत ज्याच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल. आणि महाविकास आघाडी जरी नसेल तरी आमचा पुढील सर्व प्लान तयार असल्याची अशी स्पष्ट भूमिकाही पटोले यांनी यावेळी मांडली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ४० आमदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच ते लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचंही बोललं जात आहे. अर्थात यावर अजित पवारांनी स्वत:माध्यमांसमोर येत या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तरीदेखील त्यांच्या बंडखोरीच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत हेही वास्तव आहे.

शरद पवारांच्या त्या विधानानं आघाडीवर प्रश्नचिन्ह...

एकीकडे राज्यात महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)च्या वज्रमूठ सभांनी एकापाठोपाठ धडाका लावला आहे. आणि या सभांना मिळणारा प्रतिसाद देखील दिवसागणिक वाढताच आहे. याचवेळी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणासह आघाडीच्या गोटातही मोठी खळबळ उडवून दिली होती.यानंतर त्यांनी जागा वाटप निश्चित न झाल्यानं आपण तसं विधान केलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं. पण तरीदेखील आघाडीमध्ये पडद्यामागं अनेक खलबतं सुरु असल्याचं लपून राहिलेलं नाही.

उध्दव ठाकरेंचा प्रस्ताव काय?

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वासाठी पुढाकार घेतला असल्याची चर्चा आहे. आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याची तयारी दाखविली असून तसा प्रस्तावच त्यांनी दिल्याची माहिती खात्रीशीर माहिती समोर येत आहे. आघाडीमध्ये कोणाला कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना या प्रस्तावात दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT