Bacchu Kadu & IAS Saurabh Katiyar. Google
विदर्भ

Amravati Bacchu Kadu : ‘अॅटिट्यूड’ प्रशासनाला दाखवा, जनतेला दाखवाल तर...

Amar Ghatare

Political Leader Vs Administrative Officer : अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यावर प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याचं दिसत आहे. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी झालेल्या बच्चू कडू यांच्या एका विधानातून सौरभ कटियार आणि बच्चू कडू यांच्यात सारं ‘ऑलवेल’ आहे ना, असा प्रश्न सर्वांना पडलाय.

बच्चू कडू यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार (IAS Saurabh Katiyar) यांचा उल्लेख करीत आमदार कडू यांनी त्यांना सूचना वजा इशारा दिलाय. ‘अमरावतीचे जिल्हाधिकारी प्रामाणिक आहेत, पण ते अहंकारी आहेत. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अहंकार सोडला पाहिजे. ‘अॅटिट्यूड’ तुम्ही प्रशासनाला दाखवा. जनतेला दाखवू नका. जनतेचे तुम्ही नोकर आहात हे जिल्हाधिकारी यांनी लक्षात ठेवावं. हे अधिकारी जर राजासारखे वागत असतील, तर आम्ही पण प्रजा आहोत. उखाड के फेक देंगे’, असं बच्चू कडू म्हणाले. (MLA Bacchu Kadu Suggestions To IAS Saurabh Katiyar Who is Collector At Amravati To Control His Ego)

सौरभ कटियार यांची अमरावती येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या एका कृतीमुळं ते चांगलेच चर्चेत आले होते. कटियार यांची नियुक्ती झाली तेव्हा १० ऑगस्टला बच्चू कडू यांनी अमरावती येथे विशाल मोर्चा काढला होता. मोर्चात शेतकऱ्यांची प्रचंड संख्या होती. शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यावेळी नव्याने रुजू झालेल्या सौरभ कटियार यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत मोर्चाचं स्थळ गाठलं होतं. स्वत: आमदार बच्चू कडू यांनी त्यावेळी कटियार यांना सर्वांसमक्ष निवेदन दिलं. कटियार यांच्या या कृतीमुळं त्यांचं सर्वांनी तोंडभरून कौतुकही केलं होतं. परंतु आता अचानक आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केल्यानं नेमकं काय बिनसलंय, याची चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सौभर कटियार हे 2015 मधील तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. अकोला येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यानंतर त्यांची जुलै २०२३ मध्ये अमरावती येथे जिल्हाधिकारी पदावर शासनानं नियुक्ती केली. कानपूर जिल्ह्यातील सिकंदरा तालुक्यातील ग्राम मिरगाव येथील कटियार मूळ रहिवासी आहेत. आयआयटी कानपूर येथून त्यांनी बी.टेक व एम.टेकचं शिक्षण घेतले आहे. 2014 मध्ये आयआरएससाठी त्यांची निवड झाली होती. नागपुरातील नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (एनएडीटी) मध्ये प्रशिक्षण सुरू असतानाच कटियार यांची संघ लोकसेवा आयोगानं आयएएस पदासाठी निवड केली. पालघर आणि अकोला येथे सेवा दिल्यानंतर कटियार सध्या अमरावतीत कार्यरत आहेत. अशात अचानक राज्यमंत्री दर्जा असलेले बच्चू कडू व सौरभ कटियार यांच्यात काहीतरी धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT