Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Ravikant Tupkar : पीयूष गोयल, देवेंद्र फडणवीस करणार रविकांत तुपकरांशी वाटाघाटी

जयेश गावंडे

Mharashtra Farmers Issues : सोयाबीन-कापूस प्रश्न, नुकसान भरपाई, पीक विमा, दुष्काळ यासह अन्य मुद्द्यांवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राज्यभर आंदोलनाची भूमिका घेतली. एल्गार रथयात्रा व त्यानंतर रेकॉर्डब्रेक एल्गार महामोर्चा, अन्नत्याग आंदोलन आणि मुंबईत जाऊन घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकार नरमले. सरकारने तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथी गृहावर विस्तृत चर्चा केली. बैठकीत सरकारने बहुतांशी मागण्या मान्य केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा शब्द तुपकर व शेतकऱ्यांना दिला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुपकरांना केंद्र सरकार सोबतच्या बैठकीसाठी आता बोलावून घेतले आहे. फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे शनिवारी रात्री आठ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोयाबीन-कापूस प्रश्नी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यावेळी सोयाबीन-कापसाला खासगी बाजारात दरवाढ मिळण्यासाठी आयत-निर्यात धोरणात काय बदल केले पाहिजे, या अनुषंगाने तुपकर शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. या बैठकीत काय होते त्यानंतर रविकांत तुपकर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील.

गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर (Ravikant Tupakar) शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. तुपकर यांनी यापूर्वीही तीव्र आंदोलन केले होते. यापूर्वी केलेल्या आंदोलनामध्ये तुपकरांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना हुलकाणी देत तुपकर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. खाकी वर्दीमध्ये आलेल्या तुपकरांनी अंगावर रॉकेल घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा तुपकरांनी कापूस व सोयाबीनच्या मुद्द्यावर आंदोलनाला सुरुवात केली. एल्गार रथयात्रा, एल्गार महामोर्चा घेतल्यानंतर तुपकर यांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या इशाऱ्यानंतर बुलढाणा पोलिसांनी त्यांना 20 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तुपकर यांना अटक होताच पश्चिम विदर्भातील अनेक गावांमध्ये आंदोलने झाली. पोलिसांची अटक चुकीच्या पद्धतीने असल्याचे नमूद करीत बुलढाणा न्यायालयाने तुपकरांची जामीनावर मुक्तता केली. न्यायालयातून बाहेर येताच त्यांनी सोमठाणा या आपल्या मूळगावी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी तुपकर आपल्या सहकारी शेतकऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. प्रवासात त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चेसाठी बोलावून घेतले. फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तुपकर यांनी मंत्रालय ताब्यात घेण्याचा आंदोलन स्थगित केले होते.

फडणवीसांच्या चर्चेनंतर तुपकर 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत होते. सरकारकडून बोलावणे आले नाही तर पुढच्या आंदोलनाची तयारी ते करत होते. अशातच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी तुपकरांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यानुसार शनिवारी पहाटेच तुपकर या बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT