Akola Shiv Sena Sarkarnama
विदर्भ

BJP Vs Shiv Sena: ‘वावरा’तून भाजपला शिवसेना दाखवणार ‘पावर’!

जयेश विनायकराव गावंडे

Akola Politics : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष विविध मुद्द्यांवरून एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अकोल्यातही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना विविध मुद्द्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शेतकरी संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई यासह विविध मागण्यांसाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यात 500 किलोमीटरची ही यात्रा काढण्यात येणार आहे. 2024 मध्ये विविध निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहेत. हे वर्ष निवडणुकीचे असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

लोकसभेसह, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही याच वर्षांत होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना अपेक्षित यश मिळावे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधक जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होताना दिसत आहेत. अकोल्यात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे शहरासह जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने करीत आहे.

शिवसेनेने यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सकारात्मक पुढाकार घेत आंदोलन व तोडफोड केली. शहरातील मालमत्ता करवाढ या विरोधातही शिवसेना ठाकरे गटाने जनजागृती केली. अकोल्यातील उड्डाणपूल आणि अंडरपासच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले. रस्त्याच्या मागणीसाठीही शिवसेना आक्रमक झाली. आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन उभारणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट भाजपच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजपला कोंडीत पकडण्याची किंवा घेरण्याची एकही संधी ठाकरे गट सोडताना दिसत नाही. अकोला जिल्ह्यात भाजपचे मोठे वर्चस्व आहे. विद्यमान खासदार, पाचपैकी चार विधानसभा आमदार, एक विधान परिषद सदस्य यासह महापालिकेतही भाजपची सत्ता होती. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला घेरण्यासाठी शिवसेना ठाकरे गट विविध प्रश्नांवर आंदोलन करीत भाजपच्या विरोधात एकवटला आहे.

आता शिवसेनेकडून जिल्ह्यात नव्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे. सोयाबिनला क्विंटलमागे किमान दहा हजार रुपये दर, कापसाला 15 हजार रुपये दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना ठाकरे गट ‘शेतकरी संघर्ष दिंडी’ काढणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावागावांत ही दिंडी जाणार आहे. जवळपास 300 गावांमध्ये ही दिंडी शेतकऱ्यांच्या विविध बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

दिंडीची सुरुवात खासदार अरविंद सावंत उपस्थितीत 15 फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघातून या दिंडीला सुरुवात होणार आहे. बाळापूर, अकोट, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिममध्ये या दिंडीचा समारोप होणार आहे. त्यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघात जाऊन भाजप-शिंदे सरकार विरोधात मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे चारही बाजूने भाजपला घेरण्याचा आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेना अकोल्यात करीत आहे. शिवसेनेच्या या आंदोलनाला जनतेकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT