Protest in Chandrapur. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur : पांजरेपार रीठजवळ रस्त्यासाठी शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांचा...

संदीप रायपूरे

Panjrepar Rith Village : गेल्या 25 वर्षांपासून रस्त्याची मागणी करून शेतकरी व गावकरी थकले. वारंवार निवेदन, तक्रारी देऊनही फायदा होत नसल्याने संतापलेल्या शेतकरी व गावकऱ्यांनी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील पांजरेपार रीठ गावाजवळील शिव बंधाऱ्यालगत धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे.

या आंदोलनात सोमवारी (ता. 25) जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया देण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

वरोरा तालुक्यातील पांजरेपार रीठ ते आबमक्ता व मौजा पांजरेपार रीठ ते गिरोला या रस्त्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून सतत लढा सुरू आहे. अद्यापही हा रस्ता तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावातील नागरिक गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वरोरा तालुका संघटनेने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी रस्त्याची मागणी लावून धरली आहे. आंबमक्ता, गिरोला, येरखडा ही गावे वरोरा तालुक्यात येतात. माखोना हे गाव चिमूर तालुक्यात येते.

ग्रामस्थांनी या दोन्ही क्षेत्रातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदारांना निवेदने दिली. परंतु अद्यापही त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माखोना येथील ग्रामस्थांची पांजरेपार रीठ येथे शेती आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखलातून जावे लागते. नागरिकांना जीव धोक्यात घालत नाला पार करावा लागतो. त्यानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. रस्त्याची मागणी पूर्ण करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे जगदीश मेश्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे.

धरणे आंदोलनात आबमक्ता, गिरोला, येरखेडा, माकोणा, पांजरेपार रीठ या गावातील शेतकरी, महिला सहभागी झाले आहेत. रस्त्याला दोन दिवसांत मंजुरी देण्यात आली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गिरोला, आबमक्ता, येरखेडा, माकोणा, पांजरेपार रीठ येथील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आंदोलन तीव्र होण्यापूर्वीच महसूल विभागाला यावर तोडगा काढावा लागणार आहे. अशात आंदोलन सध्या प्रशासकीय निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT