Uday Samant Latest News Sarkarnama
विदर्भ

Uday Samant News : रश्मी बर्वे यांचा अपमान काँग्रेसनेच केला, असे उद्योगमंत्री सामंत का म्हणाले..!

सरकारनामा ब्युरो

Nagpur News : रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद सुरू आहे. त्यांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. हे प्रमाणपत्र अवैध ठरविले जाऊ शकते, याची कल्पना काँग्रेसला होती. मात्र, असे असतानाही बर्वे यांनाच उमेदवारी देऊन एका महिलेचा अपमान काँग्रेसने केला असल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. ही काँग्रेसचीच खेळी असून, त्याचे खापर मात्र भाजपवर फोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात पाच टप्प्यांत मतदान होत असून, पहिल्या टप्प्यात रामटेक लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. येत्या 19 एप्रिलला येथे मतदान होईल. या मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आल्याने हा वाद सुरू झाला आहे. यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप उद्योगमंत्री सामंत यांनी केला. ते म्हणाले, बर्वे यांना काँग्रेसला उमेदवारीच द्यायची नव्हती. म्हणून आधीच दोन अर्ज भरण्यात आले होते. श्यामकुमार बर्वे यांच्या अर्जासोबत बी फॉर्मसुद्धा जोडण्यात आला होता. आता भाजपनेच हे घडवले असे सांगून मतदारांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जात आहे. काँग्रेसचेच हे षडयंत्र होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराचे नियोजनासाठी उद्योगमंत्री सामंत नागपूर (Nagpur) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध विषयांवर भाष्य केले. यापूर्वीची विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्रित लढविली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेच्या विचारांशी गद्दारी केली. खरे गद्दार तर तेच आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आमच्या संपर्कात आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणतात. याकडे लक्ष वेधले असता सामंत यांनी त्यांचेच आठ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेचीच आहे. नारायण राणे (Narayan Rane) मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्याबाबत आपण कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र, शिवसेनेचाच उमेदवार येथे राहील, असेही सामंत म्हणाले. येथे उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.

तुमाने यांना पश्चाताप होणार नाही

रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी शिवसेनेने काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. हे खरे असले तरी खासदार तुमाने यांना योग्य ती जबाबदारी दिली जाईल. त्यांनी केलेल्या त्यागाचा तुमाने यांना कोणताही पश्चाताप होणार नाही, असेही सामंत यांनी सांगितले.

( Edited By : Chaitanya Machale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT