Vikas Thakre
Vikas Thakre Sarkarnama
विदर्भ

Vikas Thakre News : कोराडी प्रकल्पावरून कॉंग्रेस-भाजप आमने-सामने, आमदार ठाकरे संतापले !

सरकारनामा ब्यूरो

Proposed 1320 MW power plant at Koradi : चंद्रपूरमधील ४२०, भुसावळमधील २१० मेगावॅटचा प्रकल्प प्रदूषण आणि स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. कोराडीत प्रचंड विरोध असताना हा प्रकल्प नागपूरवर का लादला जात आहे, असा संतप्त सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केला. (The project was opposed in the hearing)

कोराडी येथे प्रस्तावित १३२० मेगावॅट कोळशावर आधारित वीज प्रकल्पासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या सुनावणीत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यात आला. यावेळी विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेस प्रदेश सोशल मिडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, उद्योग व वाणिज्य सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, प्रदेश सचिव संदेश सिंगलकर, माजी नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर,जॉन थॉमस, प्रवीण गवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रकल्पाचा विरोध व जनतेच्या सुरक्षेकरिता एक पत्रक छापून विरोध दर्शवण्यात आला आहे. नागपूर व चंद्रपूर शहरात ऊर्जा प्रकल्पांच्या प्रदूषणामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सोबतच श्वसनाचे विकार, लहान मुले जास्त आजारी राहणे, आदी अनेक दुर्धर आजार वाढत आहेत. विदर्भात विद्युत केंद्राची क्षमता १६ हजार मेगावॅट आहे.

विदर्भातील विजेची मागणी केवळ १७०० मेगावॅट आहे. उर्वरित वीज पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जाते. मुंबई व पुणे येथे ७० टक्क्यांपेक्षा जास्त ऊर्जा वापरण्यात येते. परंतु पुण्यात एकही औष्णिक ऊर्जा प्रकल्प नाही. कोराडीतील फ्लाय ॲश कन्हान नदीमध्ये सोडली जाते. उत्तर, पूर्व नागपूरच्या नागरिकांना हे प्रदूषित पाणी पुरविले जाते. आणखी नवा प्रकल्प लादल्यास भविष्यात नागपुरात श्‍वास घेणे कठीण होईल. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील प्रस्तावित दोन प्रकल्पांवर सोमवारी (ता. २९) झालेल्या जनसुनावणीत प्रचंड गोंधळ उडाला. विरोधक आणि समर्थक आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले. सुनावणीच्या वेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोराडी येथे ६६० मेगावॉटचे दोन प्रकल्प प्रस्तावित आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी त्याकरिता जनसुनावणी घेतली. जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, प्रदूषण मंडळाचे अधिकारी अशोक करे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ. नितीन वाघ व इतरही महानिर्मितीचे अधिकारी उपस्थित होते. वाघ यांनी महानिर्मितीची भूमिका विशद केली. त्यानंतर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या विरोधात आपली बाजू मांडली.

सध्या जे प्रकल्प सुरू आहेत. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. प्रकल्पातून निघणारी राख कन्हान, कोलार नदीत सोडली जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे विकास ठाकरे म्हणाले.

काँग्रेसचे विशाल मुत्तेमवार म्हणाले, इतर ठिकाणचे प्रकल्प बंद करून कोराडीत सुरू करायचे. त्यांच्या विजेसाठी येथील लोकांनी प्रदूषण सहन करायचे. रोजगार विदर्भाच्या बाहेर आणि प्रदूषण विदर्भवासीयांना (Vidarbha) हा अन्याय आहे. प्रकल्प सुरूच करायचा असेल तर नाशिक, भुसावळ, परळीत सुरू करा. कोराडीचाच आग्रह का, असा प्रश्न मुत्तेमवार यांनी उपस्थित केला. यावेळी सुरेश साखरे, देवेंद्र गोडबोले, विशाल बरबटे यांनी प्रकल्पाच्या विरोधात बाजू मांडली.

घोषणाबाजीने दणाणला परिसर..

काँग्रेसचे (Congress) प्रदेश सचिव संदेश सिंगलकर यांनी जनसुनावणी घेण्यावरच आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसचे नेते आपली बाजू मांडून जात असताना प्रकल्पाच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. समर्थकांची मतेही ऐकून घ्यावी, असे म्हणत मुर्दाबाद-जिंदाबादची नारेबाजी सुरू झाली. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. तणाव वाढत असल्याचे दिसताच पोलिसांनी (Police) हस्तक्षेप करीत वातावरण शांत केले. काही जणांनी रोजगार मिळत असल्याचे सांगून प्रकल्पाचे समर्थन केले.

कोराडीत प्रदूषणाचा प्रश्नच नाही..

कोराडी प्रकल्पाजवळ महादुला गाव आहे. गावातील लोकांची दर सहा महिन्यांनी तपासणी होते. त्यांना प्रदूषणामुळे कुठलाही आजार नाही. मग या प्रकल्पाला विरोध का, असा प्रश्न महादुला नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी केला. आमचे या प्रकल्पाला समर्थन असल्याचे भाजप (BJP) नेते व नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी जाहीर केले. खसाळा, बोखारा, खैरी, सुरादेवी, घोगली, लोणखैरी, गुमथी, वारेगाव यासह १३ ग्रामपंचायतींनी दिलेल्या समर्थनाचे पत्र रंगारी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बंधारा फुटला, राखेचे व्यवस्थापन होणार कसे?

खापरखेडा आणि कोराडीतील वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे स्थानिकांसह लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांची शेती नष्ट झाली. पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. २.४ कोटी टन राखेचे योग्य व्यवस्थापन झालेले नाही. राखेची ठिकठिकाणी गळती होते, नदी, नाल्यांद्वारे सोडली जाते आणि उर्वरित राख हवेत उडते.

बंधाऱ्यात क्षमतेपेक्षा अधिक राख असल्याने १६ जुलै २०२२ रोजी खसाळा राख बंधारा फुटला होता. पर्यावरण आणि आरोग्याचे नुकसान होत आहे, या गंभीर समस्येकडे सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संचालिका लीना बुद्धे यांनी लक्ष वेधले. प्रस्तावित प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचे व्यवस्थापन कसे होणार अशी लीना बुद्धे यांनी चिंता व्यक्त केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT