Naresh Mhaske
Naresh Mhaske Sarkarnama
मुंबई

Loksabha Election : ठाणे, कल्याण अन् भिवंडीसाठी भाजप -शिवसेनेत दावे-प्रतिदावे सुरूच!

राहुल क्षीरसागर

Thane News : मागील काही दिवसांपासून पुन्हा भाजपकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा करण्यात येत असल्याचे दिसत आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधीकडून तशाप्रकारची विधानं करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता, शिवसेना(शिंदे गट) देखील आक्रमक पवित्रा घेत, रणनीती आखताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रमात एक बैठक घेत, ठाणे, कल्याणसह आता भिवंडी लोकसभेवरही शिंदे गटाकडून दावा करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला शिवसेना(शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, ठाणे, कल्याण, पालघर जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आणि महिला जिल्हा प्रमुख आदींसह इतर महत्वाचे पदाधिकारी होते, अशी माहिती देखील सुत्रांनी दिली.

एकीकडे नागपुरात अधिवेशन रंगत असतांना दुसरीकडे ठाण्यात आनंद आश्रम येथे शिंदे गटाच्या शिवसेनेची(शिंदे गट) ही बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीत '45 प्लस' ही मोहीम हाती घेत भाजपने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) हे प्रत्येक जिल्ह्यात जावून भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तर राज्यात शिवसेना आणि भाजपकडून हातात हात घालून राज्याचा गाडा हाकला जात असताना, ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि मतदार संघावरून दावे-प्रतिदावे आजही सुरुच आहेत.

यापूर्वी भाजपच्या काही नेत्यांकडून ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा काही दिवसांपूर्वी कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभेवरुन शिवसेनेला(शिंदे गट) डिवचल्याचे दिसून आले. तर, शिवसेनेकडून युती धर्म पाळण्यात येत असताना, दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून अशा पध्दतीने युती धर्मात बिब्बा टाकण्याचे काम का केले जात आहे? असा सवालही शिवसेनेच्या (शिंदे गट) काहींनी या बैठकीत केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

त्यामुळे अशा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजपकडूनही अशाच पद्धतीने दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण पाठोपाठ आता भिवंडी लोकसभेवर दावा या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता, भाजपकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांना शिवसेनेने देखील प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा असे आदेशही देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी राज्यात 'मिशन 48' जाहीर केले आहे. त्यानुसार संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधानसभा आणि बूथ पातळी पर्यंत विषयावर या बैठकीत चर्चा झाली. अशी प्रतिक्रिया शिवसेना(शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT