Nana Patole  Sarkarnama
मुंबई

Assembly Session : विधानसभेत पहिल्या तासातच प्रचंड गोंधळ; अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन राजदंडाला हात लावणाऱ्या पटोलेंवर निलंबनाची कारवाई

Nana Patole Suspended : नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. अशा जबाबदार व्यक्तीने अध्यक्षांच्या अंगावर धावून जाऊ नये, त्यांनी माफी मागावी, असा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 01 July : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला तास विरोधकांच्या गोंधळामुळे गाजला. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेले नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले. त्या ठिकाणी त्यांनी राजदंडाला हात लावला, त्यामुळे सत्ताधारीही आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी पटोले यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, विरोधकांचा गोंधळ वाढतच गेला. त्या गोंधळताच नार्वेकरांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केल्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

विधानसभेचे कामकाजाला सुरुवात होताच नाना पटोले (Nana patole) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे कायम शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातील शेतकरी सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. या दोघांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

नाना पटोलेंच्या मागणीवर विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर (Adv Rahul Narwekar) यांनी ‘नानाभाऊ तुमच्याकडून असंसदीय भाषेचे वापर होणे, हे मला बरोबर वाटत नाही, हे चुकीचे आहे,’ असे सांगितले. मात्र, नाना पटोले थांबायला तयार नव्हते, ते बोलत बोलतच अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि राजदंडाला हात लावला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली.

विधानसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष नाना पटोले यांना शांत राहण्याची विनंती करत होते. लोणीकर आणि कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी विरोधक करत होते. त्या गोंधळातच नार्वेकरांनी ‘नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष असताना राजदंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई करावी, याचे रुलिंग झाले आहे. त्यामुळे पटोले यांनी मला पुढची कारवाई करण्यासाठी मजबूर करू नये, आपण जागेवर बसा. अन्यथा सभागृहाचे कामकाज नियमित चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करावी लागेल, आपण जागेवर बसा,’ असा इशारा दिला.

विधानसभा अध्यक्षांच्या इशाऱ्यानंतरही विरेाधकांचा गोंधळ सुरूच राहिला, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळी गोष्ट आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणे, हे अशोभनीय आहे. अध्यक्ष दोषी आहेत, समजून त्यांच्यावर धावून जाणे आम्ही पहिल्यांदा पाहिले आहे. यापूर्वीही लोक आसनाजवळ गेले आहेत. पण ही कुठली पद्धत आहे. ही पद्धत अयोग्य आहे. नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. अशा जबाबदार व्यक्तीने अध्यक्षांच्या अंगावर धावून जाऊ नये, त्यांनी माफी मागावी, असा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरही विरोधकांकडून गोंधळ सुरूच राहिला. त्यानंतर मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारित नाना पटोले यांना दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करत आहे,’ अशी घोषणा केली.

नाना पटोले यांना निलंबित करताच विरोधक आणखी आक्रमक झाले. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या नाना पटोले यांना तुम्हाला निलंबित केले आहे, त्यामुळे तुम्ही सभागृहातून बाहेर जावे, असे सांगितले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT