Mumbai, 02 February : मागील अडीच ते तीन वर्षांपासून 'सातवें आसमान पर'असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रह फिरले की काय?, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. एकतर मुख्यमंत्रिपदाची संधी पुन्हा मिळाली नाही. त्यानंतर गृहमंत्रीपदही मिळाले नाही, तसेच सहकाऱ्यांना पाहिजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही ते मिळवून देऊ शकलेले नाहीत, त्यामुळे सध्या शिंदेंच्या मनासारखे काहीही होताना दिसत नाही. हे थोडके म्हणून की काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू गणेश नाईक हे आता ठाण्यात लक्ष घालणार आहेत, त्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अगदी एकत्रित शिवसेना असतानाही उद्धव ठाकरे ठाण्यात लक्ष घालायचे नाहीत. ठाण्याचा कारभार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकहाती होता. शिवाय, मुख्यमंत्री असल्यामुळे मंत्रिमंडळातही शिंदेंचा शब्द अंतिम असायचा. ते चित्र अगदी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. कारण, आता तर नवी मुंबईतील गणेश नाईक (Ganesh Naik) हेच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात लक्ष घालणार आहेत. आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखणाऱ्या शिंदेंना भाजपकडून आव्हान दिलं जात आहे.
ठाण्याचे (Thane) असलेले रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्षपद सोपवून भाजपने शिंदेंचा बालेकिल्ला पोखरायला सुरुवात केली होती. मात्र, आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय गणेश नाईक यांनी आता आपण ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ठाण्यात गणेश नाईकांच्या माध्यमातून दुसरे सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे.
यासंदर्भात गणेश नाईक म्हणाले, आगामी काळात मी ठाण्यात जनता दरबार भरवणार आहे. शिंदे यांचे मंत्री नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात गेले, तसेच अजितदादांचेही मंत्री पालघर आणि नवी मुंबईत येऊन त्यांनी जनता दरबार घेतला तर त्याचे मला काही गम्य वाटत नाही. एकनाथ शिंदे स्वतः नवी मुंबईत आले तर ती आनंदाची गोष्ट आहे. जनतेचे चार प्रश्न मी सोडवेन, शिंदे चार प्रश्न सोडवतील आणि अजितदादा कधी आले तर ते चार गोष्ट करतील, त्यातून लोकांची कामे होतील.
मंत्री झाल्यानंतर तो फक्त एका खात्याचा नाही, तर दुसऱ्या खात्याचा विषयही त्याच्याकडे आल्यानंतर तो संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावून जनतेला न्याय देऊ शकतो, असा दावाही नाईक यांनी केला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे कोणत्याही प्रकारचे शीतयुद्ध नाही. मी एकत्रित ठाणे जिल्ह्याचा तीनवेळा पालकमंत्री होतो. आता तर पालघर जिल्हा वेगळा झाला आहे, पूर्वी तो ठाण्यात होता. ठाणे जिल्ह्यात सर्वच संस्था माझ्या नेतृत्वाखाली होत्या. कधी कधी नशिबात बॅडपॅच येतो, तर कधी उभारीचा काळ येतो. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मी नव्हतो. पण, नवी मुंबईचे प्रश्न आम्ही आक्रमकतेने मांडून करून घेतली, असेही विधान नाईक यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.