Ravindra Waikar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांवर ईडीची धाड; मात्र उद्धव ठाकरेंच्या चुप्पीचं कारण काय ?

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव

Mumbai Political News : उद्धव ठाकरे पक्षातील अजून एक नेता ईडीच्या रडारवर आला आहे. जोगेश्वरी विधासभेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या राहत्या घरी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. ही तपासणी अद्यापही सुरू आहे. वायकरांवरील रेडबाबत प्रश्न विचारताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विषयांतर करून बोलणे टाळले. ठाकरेंनी वायकरांवर बोलणे टाळल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले.

उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत उद्या लागणाऱ्या आमदार अपात्र निकालासंदर्भात भाष्य केले. तसेच उद्याचा निकाल हा अध्यक्षांनी योग्य रीतीने घ्यावा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला धरून असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातील आमदार आणि नेते रवींद्र वायकर यांच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र ठाकरेंनी उत्तर देणेच टाळले.

रवींद्र वायकरांच्या (Ravindra Waikar) घरी सकाळपासून ईडीच्या अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे. आमदार वायकरांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्रे मिळतात का? याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

या चौकशीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, 'मला याबद्दल कल्पना आहे. मात्र राम मंदिराचे उद्घाटन होत आहे, तेव्हा आपण प्रार्थना करूया, की रामाचा आणि दुष्टांचा वध झाला पाहिजे,' असे म्हणत ठाकरे (Uddhav Thakare) यांनी नेमके उत्तर देण्याचे टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मातोश्रीवर वायकर यांच्यामार्फत अधिक पैसा येतो, अशी चर्चा होती. असे असतानाही ठाकरेंनी त्यांच्यावरील रेडबाबत बोलणे टाळल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वायकरांवरील रेड नेमकी कशासाठी ?

शिवसेनानेते आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या राहत्या घरी सकाळपासून ईडीची रेड तपासणी सुरू आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यासोबत वायकरांनी रायगड जिल्ह्यात जामीन खरेदी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. सर्वात प्रथम आरोप वायकरांवर काँग्रेसनेते संजय निरुपम यांनी केला होता. वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही वायकर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात जुलै 2021 मध्ये वायकरांनी जोगेश्वरीतील खेळाचे मैदान ताब्यात घेतले होते. त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच, यासंदर्भातील तक्रारही सोमय्यांनी केली होती.

ठाकरे गटाला लक्ष्य ?

सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात तीन नेत्यांवर ईडीचे धाडसत्र सुरू आहे. गेल्या महिन्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही कोविडकाळात केलेल्या कथित बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली होती. आता रवींद्र वायकरांवरही ईडीने धाड टाकली आहे. यानंतर ठाकरे गटातील कोणत्या नेत्याचा नंबर, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT