Sumitra Mahajan
Sumitra Mahajan Sarkarnama
मुंबई

Politics : सुमित्रा महाजन यांनी मानले गडकरींचे आभार; म्हणाल्या, अर्ध्या तासात डोंबिवलीत पोहोचले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आभार मानत रस्त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ''डोंबिवलीमध्ये यायच म्हटलं की रस्त्यांमुळे लोक डोंबिवली नको अशी प्रतिक्रिया पहिले द्यायचे. मात्र, आता डोंबिवलीतील रस्ते पाहता मी अर्ध्या तासात आले. नितीन गडकरी यांचे आभार मानले पाहिजे'', अशी प्रतिक्रिया देत त्यांनी गडकरींचे आभार मानले.

डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुलमध्ये पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी या सोहळ्यात सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

डोंबिवलीतील (Dombivli) रस्ते म्हटले की त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीची सर्वांना भीती वाटते. या रस्त्यावरून अनेक राजकारण्यांनी देखील ताशेरे ओढले. डोंबिवली रस्त्यांचे आता मात्र, कौतुक होत असल्याचे डोंबिवलीतील कार्यक्रमात पहायला मिळाले आहे.

यावेळी सुमित्रा महाजन म्हणाल्या, ''अगोदर डोंबिवलीमध्ये यायच म्हटलं की रस्त्यावरून येताना दीड तास लागायचे. आता येताना अर्धा तास लागतो. यामुळे मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानते. पुस्तकांचा कार्यक्रम असल्याने मी आज येथे आल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो यात्रे निमित्त संपूर्ण देशात पायी फिरत आहेत. यावर महाजन म्हणाल्या, ''राहुल गांधी हे भारत बघायला निघाले हे माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. किती बघितला ते कळेलच. मला आवडलं खरंच चांगली गोष्ट आहे.

त्यांना बाकीच्यांनी साथ द्यावी, त्यांच्यात चांगले बदल व्हावे, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. कारण प्रजातंत्रमध्ये विरोधी पक्षाचा नेता देखील स्ट्रॉंग असावा लागतो, तसेच समजदार असावा लागतो'' असे त्या म्हणाल्या.

तुमच्या पालकत्वाची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे, या प्रश्नावर महाजन म्हणाल्या, ''पालक म्हणून कोणी कुठून आणली माहिती नाही. एवढे मोठे पद भूषविले आहे आता इच्छा नाही, तेवढी ताकद पण राहिली नाही.

पण मी एकदा गम्मत केली होती. तेव्हा मी म्हटलं ठीक आहे पार्टीला सांगा त्यांनी मला महाराष्ट्राचा पालक करा. मी जाईन, जाऊ कशी तर पालक करावा मग मी जाईन. गोष्टी करीन महाराष्ट्राच्या लोकांशी पण पालक म्हणून पद नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या.

''पुष्कळ पदे झाली, पण इथे उगीच कशाला ढवळाढवळ करू. माझा मध्य प्रदेश मला भरपूर मान देतो. माझा इंदोर अजूनही माझ्याकडे विचारायला येतो. मला त्यांची कल्पना नाही ऐकली की बरं नाही वाटत.

महाराष्ट्र माझं माहेर आहे, म्हणून कधी कधी वाईट वाटतं. तेव्हा मी बोलते बाबांनो मला यावं लागेल कधी तरी पालक म्हणून तुमच्यात एकदा यावे लागेल, असं यावेळी त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT