Akshay Shinde-Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Akshay Shinde Encounter : दोन पोलिसांमध्ये बसलेल्या अक्षय शिंदेने पुढच्या पोलिसाचा रिव्हॉल्व्हर काढलाच कसा? जयंत पाटलांचा सवाल

Vijaykumar Dudhale

Mumbai, 24 September : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांच्या हद्दीत सोमवारी गोळीबारात मृत्यू झाला. शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतली, असे सुरुवातीला सांगण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, असे सांगण्यात आले. मात्र, त्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अविश्वास दाखवत दोन पोलिसांच्या मध्ये बसणारी व्यक्ती पुढच्या पोलिसांची रिव्हॉल्व्हर कशी काढू शकते, असा सवाल उपस्थित केला आहे.

अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या एन्काउंटरवरून राज्यात आरोपाच्या राजकीय फैरी सुरू आहेत. पोलिसांनी एन्काउंटर कसे केले. आरोपी शिंदे याचे दोन्ही हात बांधलेले असताना त्याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर कशी घेतली, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, संजय राऊत यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

अक्षय शिंदे याच्या मृत्यूबाबत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला टोकाचे प्रायश्चित व्हायला पाहिजे होते, यात कोणाचेही दुमत नाही. पण, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती.

अक्षय शिंदे याने जे कृत्य केले आहे, ज्या शिक्षण संस्थेत केलं, त्या शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि संस्थाचालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला? त्यांना कोणाला वाचवायचे आहे, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

संबंधित मुलीचे पालक पोलिसांकडे गेल्यानंतर गुन्हा नोंदवायला उशीर का केला. त्यावेळी कोणाचा दबाव होता. एक स्टोरी म्हणजे आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची रिव्हॉल्व्हर काढली आणि स्वतःचा शेवट करून घेतला. त्यानंतर काही वेळाने दुसरी स्टोरी बाहेर आली. पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. गाडीत बसलेल्या माणसाचा एन्काउंटर करायची गरज काय? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशी व्हावी, ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. या प्रकरणात आम्ही कुठेही अक्षय शिंदेचे समर्थन करत नाही, असे जयंत पाटील यांनी सांगून टाकले.

सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपावर बोलताना जयंत पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अक्षय शिंदे हा जर पोलिसांच्या जीवावर उठला होता तर मग आधी बातमी कशी आली की, त्याने स्वतःचा अंत करून घेतला आहे. आफ्टर थॉट आहे पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या.

दोन पोलिसांच्या मध्ये बसलेली व्यक्ती पुढच्या पोलिसांची रिव्हॉल्व्हर कशी काढू शकते. ज्याने गोळ्या घातल्या त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, त्याचंही नाव शिंदेच आहे. पण, अक्षय शिंदे याचं आम्ही विरोधी पक्ष कुठेही समर्थन करत नाही. त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी पहिल्यापासूनच होती. त्याचा आता अंत झाला आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांची जबाबदारी होती. घटना दाखल करून घेण्याची आणि संस्थाचालकांवर कारवाई झाली पाहिजे होती, अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT