Ravi Rana Latest Marathi News
Ravi Rana Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

एकशे एकवेळा हनुमान चालिसा पठण करून रवी राणा मतदानाला आले अन् दिलं आव्हान...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यसभा निवडणुकीच्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. मतदानाआधी खार येथील निवासस्थानी एकशे एकवेळा हनुमान चालिसा पठण केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. निवडणुकीत भूकंप होणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. (Rajya Sabha Election News)

रवी राणा (Ravi Rana) हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विधान भवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्याकडे हनुमान चालिसाची पुस्तिका होती. मतदानाला जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला. निवडणुकीत भूकंप होणार असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं.

राणा म्हणाले, मी 101 वेळा हनुमान चाळीसा वाचून आलोय. हनुमान चाळीसा मातोश्री समोर म्हटली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता विधान भवनात जातोय. आता गुन्हा दाखल होतोय का ते पहातो. उध्दव ठाकरे म्हणताहेत कशमीरमध्ये जाऊन हनुमान चाळीसा वाचा. मातोश्रीबाहेर उध्दव ठाकरे ज्या वेळी हनुमान चाळीसा वाचतील त्यादिवशीा मी कशमीरमध्ये जाऊन वाचेन. ज्यांनी हनुमान चालीसाचा अपमान केला, त्यांचा विनाश होणार आहे.

दरम्यान, भाजपने (BJP) कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

आज राज्यसभेसाठी (Rajyasabha) मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. अपिलाचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा, अशी अपेक्षा आहे असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

मतदान कसं होत आहे, याचा अंदाज घेऊन जवळपास सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शेवटी मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारच मतदानासाठीचे डावपेच आखले गेले आणि मतदान केले गेले. कॉंग्रेसने आपले दोन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे मतदान राखून ठेवले होते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे मतदान राखून ठेवले होते. त्यांनी सर्वात शेवटी मतदान केले.

आत्ताच्या घडीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांचं मतदान झालं आहे. राष्ट्रवाद कॉंग्रेसच्या ९ आमदारांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना मतदान केले, तर कॉंग्रेसने आपली पहिल्या पसंतीची २ मते संजय पवार यांच्या पारड्यात टाकली. राष्ट्रवादी समर्थक अपक्ष तीन मतेसुद्धा संजय पवार यांना दिली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजूनही आपली दोन मते वाढतील, या प्रतीक्षेत आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केलेले आहे. त्याच्या निकालाची वाट राष्ट्रवादीचे नेते बघत आहेत.

विधानभवन मुंबई येथे दुपारी २ वाजेपर्यंत २८१ आमदारांनी मतदान केलेले आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी जितेंद्र आव्हाडांप्रमाणे नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. या दोन्ही मुद्द्य़ांवर भाजपने हरकत घेतली आहे. ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. पण ही दोन्ही मते ग्राह्य धरण्यात आलेली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT