Assembly Session  Sarkarnama
मुंबई

Kharghar Incident In Assembly : असा हा कोण शहाणा आहे? ‘त्या’ मृत्यूला तो शहाणा जबाबदार ठरवा; जयंत पाटील कडाडले

सरकारनामा ब्यूरो

Assembly session : खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन महिन्यांपूर्वी समित नेमली. त्या समितीला १३ जुलै रोजी मुदतवाढ दिली. त्यावेळी १३ ते १४ लोकांचे मृत्यू झाले. कार्यक्रमाचे काय पद्धतीने आणि कुणी आयोजन केले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आणि आपुलकी आहे. त्यांच्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही. भरउन्हात साडेसहाशे एकरांवर वीस लाख लोकांना बोलावणे आणि त्यांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागणं. असा हा कोण शहाणा आहे, ज्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्या शहाण्या व्यक्तीने हा कार्यक्रम घेतला आहे, त्याला याबाबत कारणीभूत ठरवलं पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजक आणि सरकारचे वाभाडे काढले. (Jayant Patil is aggressive over the incident during the Maharashtra Bhushan Award)

खारघर (Kharghar) येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमावेळी १६ सेवकांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उष्णतेचा अंदाज वर्तवून चुकीच्या वेळी कार्यक्रम ठेवला. सरकारी कार्यक्रम असल्याने त्याची जबाबदारी सरकारची आहे. नियोजनाची जबाबदारी असलेली कंपनी व उपकंपनीवर गुन्हा दाखल केला आहे का?, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? आणि मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार का? असा प्रश्न शिवसेनेचे (Shivsena) गटनेते आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) यांनी उपस्थित केला होता. त्यावर वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे उत्तर देत होते. मात्र, पाटील यांनी त्यावर हरकत घेत प्रश्न उपस्थित केले.

आमदार चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी खारघरमधील दुर्दैवी घटनेवर चर्चा होणे गरजचे आहे. मात्र, त्यावर कशा प्रकारे राजकारण केले गेले, हे सर्वांनी पाहिले आहे. त्याचवेळी विरोधकांकडून आक्षेप घेताच मी तुम्हाला म्हटलेले नाही, असे सांगितले. मात्र, विरोधकांचा गोंधळ वाढतच गेला. विधानसभा अध्यक्षांनी त्यात हस्तक्षेप केला. अखेर नेमके उत्तर देण्याची सूचना अध्यक्षांनी केली.

बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनी यावर हरकतीचा मुद्दा मांडला. तो मांडत असतानाच मंत्री मुनगंटीवार हे उभे राहून बोलत होते. तेव्हा चिडून थोरात म्हणाले की, मला अध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिली आहे. मला हरकतीचा मद्दा मांडायचा आहे. तुम्हाला खाली बसावं लागेल. हा दुसरा प्रकार आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी तुमच्या काळातील घटना पाहाव्या लागतील, अशी भाषा वापरली. खारघरच्या घटनेत १३ -१४ लोकांचा जीव गेलेला आहे, त्याला राजकारण कसे म्हणता?, असा सवाल केला.

थोरातांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांना पुन्हा नेमके उत्तर देण्याची सूचना मंत्र्यांना केली. मुनगंटीवार म्हणाले की, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होऊ शकत नाही. ते का होत नाही, हे विभागाकडून सविस्तर माहिती दिली आहे. कार्यक्रमासाठी व्यवस्थेचे उत्तम नियोजन केले होते. एकाही श्री सेवकाने व्यवस्थेबाबत तक्रार केलेली नाही. मृत्यूच्या कुटुंबाकडून माहिती घेतली, त्यातही तक्रार नाही. श्री सेवकांना ३०६ एकर बसण्याची व्यवस्था केला. या मोठ्या क्षेत्रावर मंडप टाकला असता तर व्हेंटिलेशनचा प्रश्न निर्माण झाला असता, असे उत्तर दिले.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हरकत घेत म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे ज्या मंत्र्यांनी आयोजन केले, त्याच मंत्र्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यायला लावणे आणि त्यांनी त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करणं, हे सभागृहातील चित्र दिसत आहे. हा विषय गृहखात्याकडे देऊन त्यांच्याकडून यावर उत्तर घ्यायला पाहिजे होते. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवून उद्या पहिल्या नंबरला गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे. या घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला मुदतवाढ न देता पंधरा दिवसांत तो अहवाल सभागृहासमोर आणावा. समितीचे निष्कर्ष सभागृहासमोर ठेवले पाहिजे. गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे, यासाठी प्रश्न राखून ठेवावा.

त्यानंतरही उत्तर द्यायला उठलेल्या मुनगंटीवारांना पाहून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर मंत्र्यांनी विरोधकांची नियत आणि नीती खराब आहे. यांना प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायचं आहे. त्यानंतर दोन्ही बाजूकडून गोंधळ वाढतच गेला. अखेर नार्वेकर यांनी उठून ‘हे बरोबर नाही. तुम्ही प्रश्न विचारला आहे, मंत्र्यांना उत्तर देऊद्यात’ असे सूचविले.

समितीने मुदतवाढ मागितली हेाती, म्हणून त्यांना मुदतवाढ दिली. मागील अशा अनेक समितींना मुदतवाढ दिल्याचे उदाहारणे मंत्री मुनगंटीवर यांनी दिली. आमच्याकडील काही राजकीय पक्ष सत्तेसाठी लालसा ठेवून आहेत. एक रुपयाचीही मदत त्यांनी केलेली नाही. पूर्वी सभागृहात लोकहिताच्या सूचना केल्या जायच्या. आता काही लोक शहाणपणा करत शुद्र राजकारण करत आहेत. सभागृहाच्या आयुधाचा वापर करत सत्तेच्या खुर्चीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहेत. मुनगंटीवार बोलत असताना विरोधक मात्र निषेधाच्या घोषणा देत होते. ‘नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी,’ अशा घोषणांनी सभागृहा दणाणून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT