Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : संत तुकारामांचा 'तो' अभंग अन् जयंत पाटलांचे मुख्यमंत्री शिंदे, अजितदादांना चिमटे

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे. यावर आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या अर्थसंकल्पावर अधिवेशनात सध्या च्रचा सुरू आहे. यावेळी सत्ताधारी मंडळी आणि विरोधकांत चांगलीच खडाजंगी होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे आपल्या भाषणाची सुरूवात जगदगुरू संत तुकारामांच्या अभंगाने केली. या अभंगातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह तालिका अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनाही चिमटे काढले.

जयंत पाटील यांनी,

घासावा शब्द तासावा शब्द

तोलावा शब्द बोलण्यापूर्वी

बोलावे मोजके, खमंग, खमके

ठेवावे भान देश काळात पात्राचे

बोलावे बरे बोलावे खरे

कोणाच्याही मनावर पडू नये चरे

कोणाचेही वर्म, वर्ण अन् बिंग

जात-पात, धर्म काढूच नये

जिभेवरी ताबा सर्व सुख दाता

पाणी, वाणी, नाणी नासू नये

हा अभंग सांगितला. यानंतर त्यांनी अभंगाचा अर्थ सांगून अर्थसंकल्पावर टीका केला.

जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, यातील पाणी, नाणी, वाणी या सर्व गोष्टी वाया घालवू नये, हाच संदेश तुकोबांनी दिलेला आहे. आता मात्र राज्यात पाणी वाया चालले आहे. वाणीबद्दल तर काही बोलायलाच नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण आपण ऐकलेलेच आहे. त्यामुळे मी वाणीबद्दल बोलणेच टाळत आहे. आता राज्यात नाणी कशी वाया घालवली जात आहेत, हे सांगणार असल्याचे म्हणत जयंत पाटलांनी अर्थसंकल्पातील त्रुटी सांगितल्या.

अजित पवारांनी Ajit Pawar सुरुवातीला निर्मल वारीसाठी 36 कोटी रूपयांचा निधी दिल्याचे स्पष्ट केले. पंढरीची वारी म्हणजे इंद्रायणी आणि भीमा नदीची भेट. आज मात्र या दोन्ही नद्यांची वाईट अवस्था झालेली आहे. यातील पाणी जनावरेही पीत नाहीत. वारीचा मूळ आत्मा हा या दोन नद्या आहेत. त्यासाठी मात्र अर्थमंत्री पवारांनी काहीही केलेले नाही. आता निर्मल वारीसाठी मोठा निधी दिलेला आहेच, तर या दोन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी काहीतरी करावे, अशी विनंतीही पाटलांनी केली.

जयंत पाटील यांनी, भाजपचा 2019 मधील जाहीरनामा वाचला. त्यातील एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेले नाही, असा आरोप केला. यावेळी आमदार संजय कुटेंनी पाटलांना टोकले. यावर तालिका अध्यक्ष कोळंबकरांनी कुटेंना शांत राहण्यास सांगितले. तर जयंत पाटील यांना अर्थसंकल्पावर बोला अशी विनंती केली.

गरीब की थाली मे पुलाव आ रहा है, लगता है राज्य मे चुनाव आ रहा है, असे म्हणत जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने फक्त घोषणांचा पाऊस केल्याची टीका केली. त्यानंतर त्यांनी देशात, राज्यात सुरू असलेल्या पेपरफुटीवरून सरकारला धारेवर धरले.

तालिका अध्यक्षांना टोला

जयंत पाटील अर्थसंकल्पाला सोडून बोलत असल्याचे पाहून तालिका अध्यक्ष कोळंबकरांनी पाटील यांना फटकारले. तुम्ही जे बोलताय हे बजेटवरचे भाषण आहे का, असा प्रश्न केला. यावर पाटील यांनी आमदार संजय कुटे हे तरी कुठे बजेटवर बोलले. त्यांच्यावर तुमची मेहरबानी आहे, असे प्रत्युत्तर दिले.

त्यानंतर कोळंबकरांनी जयंतराव कुटेंपेक्षा तुम्ही जास्त अनुभवी आहात, असे म्हणून बेजटवरच बोला असा आग्रह केला. यावर जंयत पाटील यांनीही कोळंबकरांना, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात असेही उत्तर दिले. सभागृहातील सर्वांचा अनुभव घेतल्यानंतरच तुम्ही अध्यक्षाच्या खुर्चीत बसलात. त्यामुळे तुम्ही शांतच बसायचे. ही सर्वसाधारण चर्चा आहे असे जयंत पाटलांनीही ठासून सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT