Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil Speech : 'आरक्षण मिळो न मिळो...पण आझाद मैदानाकडे जाणार'; जरांगेंनी वाढवलं सरकारचं टेन्शन

Ganesh Thombare

Mumbai News: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमधून लाखो मराठा बांधवांसह पदयात्रा सुरू केलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. लाखो मराठा बांधवांसह ते नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत पोहोचण्याआधीच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली.

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र, ज्या मागण्या मान्य केल्या त्या मागण्यांचे अध्यादेश काढले नाहीत, त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उद्या शनिवारी दुपारपर्यंत सरकारने जीआर काढावा, अन्यथा आपण आझाद मैदानाकडे जाणार, असा नवा अल्टीमेटम त्यांनी सरकारला दिला. (Manoj Jarange Patil Speech On Maratha Reservation)

तसेच जर राज्य सरकारने अध्यादेश काढला तर गुलाल उधळण्यासाठी आपण आझाद मैदानावर जाणार, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास मागण्या पूर्ण केल्या आहेत. पण शासन निर्णय आणि अध्यादेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे जो पर्यंत अध्यादेश देण्यात येत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही. आज रात्री अध्यादेश काढावा, अन्यथा आम्ही उद्या आझाद मैदानावर येणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे यांनी मांडलेल्या मुद्यांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करण्याची शक्यता आहे. तसेच मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या सरकारने ज्या मागण्या मान्य केल्या, त्या मागण्यांचा अध्यादेश सरकार काढणार का ? तसेच जर सरकार अध्यादेश काढणार असेल तर कधी काढणार? हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, "आत्तापर्यंत राज्यात मराठा समाजाच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदींचे प्रमाणपत्र द्या. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीला लावा. तसेच शिबीरे घ्या आणि प्रमाणपत्र घ्या. ज्या नोंदी मिळाल्या आहेत, त्याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांना देखील प्रमाणपत्र द्या", अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे.

याबरोबरच 54 लाख नाही तर 57 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र वितरीत करा. आत्तापर्यंत 37 लाख प्रमाणपत्र वितरीत केले आहेत, असं त्यांनी सांगितले. याबरोबरच 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं, अशी मोठी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे.

दरम्यान, यासह आदी मागण्या सरकारने जवळपास पूर्ण केल्या आहेत. मात्र, या सर्व मागण्यांचा शासन निर्णय अर्थात अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे जो पर्यंत अध्यादेश देण्यात येत नाही, तो पर्यंत मी मागे हटणार नाही. आज रात्री अध्यादेश देण्यात यावा, अन्यथा उद्या आपण आझाद मैदानावर जाणार आहोत, जर सरकारने उद्यापर्यंत अध्यादेश काढला तर आपण गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानावर जाऊ, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. त्यामुळे यावर आता सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

(Edited by Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT