Manoj Jarange Patil, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maratha Aarakshan Vishesh Adhiveshan: 'विशेष अधिवेशन' बोलावलं खरं; पण जरांगेंच्या लढ्याला यश मिळणार का?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब-

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे. मराठा समाजाला उच्च न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये 12 टक्के तर शिक्षणात 13 टक्के आरक्षण लागू केलं होतं, याच धर्तीवर 12 आणि 13 टक्के आरक्षण द्यावं, अशी शिफारस आयोगाने केली आहे. कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावे, यासाठी यापेक्षा कमी टक्के आरक्षण नसेल, असा अंदाज आहे. मात्र सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले तरी याविरोधात पुन्हा कोर्टबाजी होऊन आरक्षणाचा गुंता कायम राहणार असल्याची दाट शक्यता आहे.

अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर होईल, तसंच सभागृहात मंजूर झालेले मराठा आरक्षण विधेयक कोर्टातही टिकेल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे. मात्र या आरक्षणाला पुन्हा कोर्टात आव्हान दिले जाईल. मनोज जरांगे पाटील यांना थोपविण्यासाठी सरकारने हे अधिवेशन बोलावले असले तरी हा गुंता कायम राहणार असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी हा सर्व प्रकार म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर असा असणार आहे.

एक दिवसीय अधिवेशनात फक्त मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. विधेयक मांडल्यानंतर फक्त गटनेत्यांना बोलू दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: मराठा आरक्षण विधेयकाचा मसूदा वाचणार आहेत. राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून दिलेल्या शिफारसींनुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे.

गेल्याच आठवड्यात सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारला होता. त्यानुसार मराठा समाजातील कुणबी नोंदी नसलेल्या लोकांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. तर कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना पूर्वीच्या कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू होईल. मात्र, विशेष अधिवेशनात पारित होणाऱ्या कायद्यात कुणबी नोंदीचे आरक्षण सगेसोयऱ्यांनाही लागू होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले..?

‘विशेष अधिवेशन बोलावून काही होणार नाही. हा विषय राज्याचा नाही. हा केंद्राचा आणि सुप्रीम कोर्टातील विषय आहे. मराठा आरक्षणाच्या विषयात अनेक तांत्रिक समस्या आहेत. त्या समस्या सुटल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. हे सगळं झुलवलं जातंय, यामधून हाताला काही लागणार नाही. मी त्यादिवशी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना समोर जाऊन सांगितलं होतं ना, काही होणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT