Devendra Fadnavis, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : ऐन मराठा आंंदोलनात फडणवीसांना गोवारी हत्याकांडाची आठवण का आली ?

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले होते. गृहमंत्र्यांच्या आदेशानेच पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आघाडीवर होते. या वेळी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोवारी हत्याकांडाची आठवण करून देत पवारांवर जोरदार पलटवार केला होता. परिणामी ऐन मराठा आंदोलनामुळे राज्य तापले असतानाही गोवारी प्रकरणाची चर्चा होती.

शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर गरज नसतानाही पोलिस बळाचा वापर केला. गृहविभागाच्या आदेशाशिवाय अशा प्रकारे लाठीचार्ज होऊच शकत नाही, असा गंभीर आरोप पवारांनी केला होता. 'राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. हे चित्र जालन्यात दिसले आहे. यात पोलिसांना काय दोष देणे योग्य नाही. ते आदेशाचे गुलाम असतात. याची पूर्ण राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी आहे,' असे म्हणत पवारांनी लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला.

पवारांनी केलेली टीका फडणवीसांच्या जिव्हारी लागली होती. परिणामी त्यांनी नागपूर येथे झालेल्या गोवारी हत्याकांडाची पवारांना आठवण करून दिली. गोवारी हत्याकांड १९९४ मध्ये झाले, त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते.

शरद पवारांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'कालपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही, असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांची अचनाक भूमिका बदलली. आता आमच्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले ? हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे.' तसेच गोवारी हत्याकांडाची आठवण करून देत फडणवीसांनी पवारांची कोंडी केली होती.

पवारांनी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला. ते म्हणाले, मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरू होते. पोलिसांनी त्यांना आंदोलन थांबवण्यास सांगितले होते. मात्र, अचानकच पोलिसांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांबाबत पोलिस बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, लोक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी," असे सांगत पवारांनी थेट फडणवीसांवर हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवारांच्या कडव्या टीकेवर फडणवीसांनी गोवारी हत्याकांडाची आठवण करून दिली. 'पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झाले. त्यावेळी ११4 लोकं मृत्युमुखी पडले. त्यावेळी त्यांनी गोवारींची साधी विचारपूसही केली नाही. राजीनामाही दिला नाही. आता या परिस्थितीत त्यांचे काही लोक आमच्यासोबत सत्तेत आले आहेत. त्यामुळे ते नाराज आहेत, चिडलेले आहेत, व्यथित आहेत. यातूनच ते असे आरोप करतात, असेही फडणवीस म्हणाले होते.

फडणवीसांनी राजीनाम्याचा उल्लेख केल्यानंतर पवारांनीही तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिल्याची आठवण करून दिली. तसेच मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जची जाबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, काही दिवस गोवारींवरून चाललेल्या फडणवीस-पवारांच्या या शाब्दिक चकमकीनंतर वातावरण तापले होते. परिणामी मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतरही गोवारी हत्याकांडचीच चर्चा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT