Anjali Damania-Walmik Karad Sarkarnama
मुंबई

Walmik Karad : वाल्मिक कराडला मकोका लागताच अंजली दमानिया यांनी केली ही मागणी

Santosh Deshmukh Murder Case : परळीत धमक्या येणं, जीवे मारण्याच्या धमक्या येणं, हे वारंवार घडत होतं. पण, त्याची चौकशी कोणामुळे थांबली. कोणामुळे सात ते आठ महिने त्या तक्रारींची चौकशी झाली नाही.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 14 January : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी एसआयटीने वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. त्यानंतर समर्थकांनी परळीत बंद पुकारला असून आत्मदहनाचा प्रयत्नही केला आहे. दरम्यान, कराडवर मकोका लावताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा मोठी मागणी केली आहे. वाल्मिक कराडवर कारवाई होण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, हा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा नव्याने मांडला आहे.

अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, मे महिन्यापासून चौकशी लावली असती, तर संतोष देशमुख आज जिवंत असते. परळीत धमक्या येणं, जीवे मारण्याच्या धमक्या येणं, हे वारंवार घडत होतं. पण, त्याची चौकशी कोणामुळे थांबली. कोणामुळे सात ते आठ महिने त्या तक्रारींची चौकशी झाली नाही. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यामुळेच वाल्मिक कराडवर कारवाई झाली नाही.

जोपर्यंत धनंजय मुंडेंची (Dhananjay Munde) राजकीय दादागिरी आहे, राजकीय वरदहस्त आहे. तोपर्यंत कराडवर कारवाई होणार नाही, म्हणून धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. यावर जोपर्यंत शहनिशा होत नाही, तोपर्यंत या मुद्यावर लढत राहणार आहे, असेही दमानिया यांनी स्पष्ट केले.

अंजली दमानिया म्हणाल्या, धनंजय मुंडे हे ३० डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड शरण येतो, हा योगायोग नाही. कदाचित वाल्मिक कराडला सांगण्यात आलं असेल. तुझ्यावर खंडणीचा गुन्हा आहे, त्यात तुला काही होऊ दिलं जाणार नाही. त्यामुळेच खंडणी आणि संतोष देशमुख खून प्रकरण ही दोन्ही प्रकरणं मुद्दाम वेगवेगळी केली आहेत, असा माझा आरोप आहे.

खरं तर बीडमधील प्रकरण एकच आहे. ते मे महिन्यापासून चाललं होतं. अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे हे मे महिन्यापासून सांगत होते की, आम्हाला धमक्या येत आहेत. जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काम बंद करण्यासाठी धमकावले जात आहे. खंडणीसाठी धमक्या दिल्या जात आहेत. हे चार मुद्यांचा विचार करून तेव्हाच मकोका लावण्याची गरज होती. तो लावला असता तर आज संतोष देशमुख आपल्याबरोबर असते, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला.

तब्बल सात महिने कारवाई झाली नाही. संतोष देशमुख यांचा खून झाला. त्यानंतर दीड महिना होत आला आहे. तरी या प्रकरणाला योग्य दिशाही मिळत नाही, त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळेल, असं आपण कसं म्हणायचं. पण, परमेश्वर देशमुख कुटुंबीयांना नक्कीच न्याय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT