Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Video Monsoon Session : फडणवीस-ठाकरेंच्या भेटीला 24 तासही उलटत नाहीत तोच 'हे' दोन प्रतिस्पर्धी नेते समोरासमोर चर्चांना उधाण

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis meeting : अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस-ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना जोर आला असतानाच, शुक्रवारी म्हणजेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही अशाच दोन मोठ्या नेत्यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 28 June : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र राहूनही प्रदेशाध्यक्षपदासाठी एकमेकांचे महिने दिवस मोजणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोन नेत्यांमधील सुप्त संघर्ष राज्याने जवळून पाहिला आहे. पण राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही, याचाच प्रत्येय आज पुन्हा एकदा आला. (Ajit Pawar and Jayant Patil)

काल गुरुवारी एकेकाळचे राजकीय मित्र आणि सध्याचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळातील भेटीला २४ तास होत नाहीत. तोच अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आज विधिमंडळात समोरासमोर आले, विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षणांचा संवादही झाला.

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या एका अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन्ही एकाच लिफ्टमधून विधिमंडळात गेल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले गेले.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गट आणि भाजप पुन्हा येणार का? अशा चर्चांनादेखील सुरुवात झाली. मात्र, 'ना... ना... करते प्यार, तुम्ही से कर बैठे,' असं काही आता होणार नाही, अशा शब्दात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना ठाकरेंनी पुर्णविराम दिला. अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना जोर आला असतानाच, शुक्रवारी म्हणजेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही अशाच दोन मोठ्या नेत्यांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

मागील दोन वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ झाली. ज्यामध्ये, शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेलं बंड तर अजित पवारांनी सोडलेली शरद पवारांची साथ. या दोन्ही राज्याच्या राजकारणातील अनपेक्षित आणि मोठ्या घटना घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी नवीन समीकरण निर्माण झाली.

या सर्व राजकीय घडामोडीनंतर कधीकाळी एकत्र सभागृहात बसलेले, एकमेकांच्या मांडीला मांडी लावून विधानसभेत कामकाज केलेले अनेक नेते एकमेकांपासून लांब गेले. इतके लांब की त्यांनी एकमेकांचं तोंड पाहणं देखील बंद केलं होतं. मात्र आता या नेत्यांचं अधिवेशानाच्या निमित्ताने का होईना एकमेकांशी बोलणं होतं आहे.

शुक्रवारी अशाच राज्यातील दोन बड्या नेत्यांनी अनेक दिवसांनी एकमेकांशी संवाद साधला. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली. विधानसभेत अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी जात असताना हे दोन्ही नेते अचानक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. तर यावेळी या दोघांमध्ये काही क्षणाचा संवादही झाला. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

शिवाय राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे या नेत्यांचे पुन्हा मनोमिलन होणार का? अशा चर्चांनाही उधाण आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून अजित पवार गटातील आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. तर अनेक भाजपनेते अजित पवार हे महायुतीत नकोत असं उघडपणे बोलत आहेत. त्यामुळे पुढील काळात राज्यातील राजकारण कोणत्या दिशेला जाईल हे आताच सांगणं कठीण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT