Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thackery And Shinde Group : वर्धापन दिनादिवशीच ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचलं; म्हणाले, "प्रतिमंडळ..."

सरकारनामा ब्यूरो

Thackeray And Shinde Camp : शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेच्या इतिहासात यंदा प्रथमच दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत. शिवसेनेच्या या दोन्ही गटांच्या वर्धापन दिनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, वर्धापन दिनादिवशीच 'सामना'तून शिंदे गटाच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. पुराणकाळात प्रतिसृष्टी निर्माण झाली. त्यानतंर अनेक देवस्थानचे प्रतिमंदिरेही झाली. मात्र सोन्याची सर लोखंडाला कशी येणार. शिवसेनेचे प्रतिमंडळ स्थापणारे काळाच्या ओघात नष्ट होतील, असा घणाघात 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. तर खऱ्या व मूळ शिवसेनेच्या रक्तात गद्दारी नसल्याचेही म्हटले आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, "शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. आज बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत. पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे. हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेना ५७ वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या!"

आम्हीच खरे असे म्हणणे ही शिंदे गटाची राजकीय मजबूरी असल्याचा टोलाही यावेळी लगावला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, "ईडी सरकार आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘उधारी’च्या मालावर या शिंदे गटाची राजकीय दुकानदारी सुरू आहे. पुन्हा घटनातज्ञांपासून न्यायालयांपर्यंत सर्वांनी त्यांना बेकायदा ठरवले. मात्र राजकीय दुकानदारी सुरू ठेवायची तर ‘नक्कल’ करायलाच हवी. त्यांची ही राजकीय मजबुरी आहे. त्या मजबुरीतूनच खऱ्या वाघाची नक्कल करण्याची, स्वतःला विचारांचे वारसदार वगैरे म्हणवून घेण्याची नौटंकी सुरू आहे. पण शेवटी नकली ते नकली आणि असली ते असली! गद्दार ते गद्दार आणि खुद्दार ते खुद्दारच!"

प्रतिशिवसेना स्थापणारे काळाच्या ओघात नष्ट होतील, असा हल्लाही यावेळी करण्यात आला आहे. शिवसेना स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे. कोणी कितीही बेइमानी केली तरी 'सामना' शिवसेनाच जिंकत आली. सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील 40 बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले. त्यानंतर 'आम्हीच खरी शिवसेना' असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले.

दरम्यान, ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानतंर आज दोन्ही शिवसेना वर्धापन दिन साजरा करणार आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात दोन्ही गटांकडून पुन्हा एकमेकांना लक्ष्य केले जाणार आहे. ते आता काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT