Rahul Gandhi Nyay Yatra Sarkarnama
मुंबई

Rahul Gandhi Nyay Yatra : दिघेंच्या शक्तिस्थळावर राहुल गांधी नतमस्तक होणार का?

Chetan Zadpe

Thane News : ठाणे शहरात शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या निधनाच्या 23 वर्षांनंतरही त्यांच्याच नावाने शहरात मतांसाठी राजकारण केले जाते. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे 16 मार्च रोजी ठाणे शहरात भारत जोडो न्याय यात्रेनिमित्ताने येत आहेत. ही यात्रा कळव्यात येताना दिवंगत दिघे यांचे स्मृतिस्थळ असलेल्या खारकर आळी येथे शक्तिस्थळाजवळूनच मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे गांधी हे शक्तिस्थळावर जाऊन दिघेंच्या स्मृतीस अभिवादन करतात का? हे पाहावे लागणार आहे.

दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभेचे संभाव्य उमेदवार व विद्यमान खासदार राजन विचारे यांचेही गुरू असल्याने मतांचा जोगवा या निमित्ताने महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याबरोबरच, भविष्यात काँग्रेसलाही सुगीचे दिवस अनुभवता येतील, अशी शक्यताही राजकीय तज्ज्ञ मंडळींकडून वर्तवली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे शहर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेना फुटीनंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. बहुसंख्य ठाणे शहरासह जिल्ह्यातील शिवसेनेतील लोकप्रतिनिधी, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या गटात जाणे पसंत केले आहे. मात्र, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे या दोन्ही नेत्यांची नावे घेऊन राजकारण करत आहेत. अशातच ठाणे मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी म्हणजेच शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी आपापला दावा केला होता. आता शिंदे गटाकडून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, भाजप पक्षाने अद्यापही या मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवला आहे.

ठाण्यात कोणत्याही निवडणुका लागल्यानंतर दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने राजकारण केले जाते. शिवसेना (Shiv Sena) असो या भाजप किंवा मनसे या पक्षाकडून मतांसाठी दिघे यांच्या नावाचा वापर केला गेला आहे किंवा केला जात आहे, तर मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही दिघे यांचे बॅनर लावण्यात आले होते.

यामध्ये काँग्रेस पक्षच (Congress) मागे आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतांचे राजकारण सुरू झालेले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत दिघे यांच्या नावाने अद्यापही मतांचे राजकारण केले जाते. दिघे यांच्या ठाण्यातील शक्तीस्थळ असलेल्या ठिकाणी राहुल गांधी यांनी जाऊन अभिवादन केले, तर त्या दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेसला फायदा होईल, असा विश्वास राजकीय तज्ज्ञांना वाटतो. ही संधी काँग्रेसने सोडू नये. स्थानिक काँग्रेस नेतेमंडळींनी राहुल गांधींच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, असेही मत व्यक्त केले जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT