Eknath Shinde - Rahul Narwekar  Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar News : औरंगाबाद, उस्मानाबाद, नगरनंतर आता 'या' शहराचं नामांतर ? राहुल नार्वेकरांची मागणी

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे प्रचार सभा, भेटीगाठी, इन्कमिंग-आउटगोइंग तसेच आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलेल्या एका मागणीमुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचीदेखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पण आता हेच नार्वेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी अलिबागचं नामांतर करण्याची मागणी केली आहे.

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव, अहमदनगरचं अहिल्यानगर या नामांतरांनंतर आणखी एका शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण बदलून ‘मायनाक नगरी’ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

याच पत्रात त्यांनी मायनाक भंडारी यांचे शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, असेही ते म्हणाले आहेत.पण नार्वेकरांच्या या मागणीला अलिबाग शहरामधूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रात नार्वेकर नेमकं काय म्हणतात ?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांनादेखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’ हे नामकरण करावे, असे नमूद करण्यात आले आहे.

नार्वेकर म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना अतिशय महत्त्व आहे. महाराजांनी दूरदृष्टीने बलाढ्य आरमाराची उभारणी केली. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवल्यास सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती.

या वेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकरांनी अलिबागच्या (Alibaug) नामांतराची मागणी अतिशय रास्त असून, त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी यांद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, असेही ते म्हणाले आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT