BJP Rajya Sabha Election Sarkarnama
मुंबई

BJP Rajya Sabha Election: चव्हाणांच्या 'एन्ट्री'नंतर भाजपने 'मोहरे'च बदलले; राणेंचा राज्यसभेला पत्ता कट ?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब-

Mumbai News : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पियूष गोयल यांना राज्यसभेची उमेदवारी न देता या दोन्ही अनुभवी नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याआधी प्रथम “सरकारनामा”ने भाजप असा निर्णय घेऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता.

काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये(BJP Rajya Sabha Election) रितसर प्रवेश केला. भाजपकडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार आहे, हे निश्चित. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होत असून नारायण राणे आणि पियूष गोयल हे राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते.

मात्र, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने सर्व समीकरणे बदलली आहेत. भाजपला कोणताही धोका न पत्कारता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवायचे आहे. उर्वरित दोन जागांवर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे आणि पियूष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.

नारायण राणे यांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उध्दव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात उभे राहतील. विनायक राऊत दोन वेळा या मतदार संघाचे खासदार असून या भागात ठाकरे सेनेची मोठी ताकद असून ती मोडून काढण्यासाठी राणे यांच्यासारख्या आक्रमक आणि राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नारायण राणे (Narayan Rane) यांच्याशिवाय पियूष गोयल आणि भागवतराव कराड या दोन राज्यसभेतील खासदारांना यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. यापैकी पियूष गोयल यांना पूनम महाजन यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले जाईल. पूनम यांना यावेळी उमेदवारी मिळण्याची अजिबात शक्यता वाटत नाही.

राज्यसभा निवडणुकीत अशोक चव्हाण वगळता आणखी तीन जागांवर भाजपकडून उमेदवार उभे केले जातील. यापैकी एका जागेवर काँग्रेसचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बऱ्याच काळापासून कोणती मोठी जबाबदारी किंवा पद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते.

राज्यातील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार राज्यसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा भाजप, एक जागा शिंदे, एक जागा अजितदादा गट आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. परंतु अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसच्या काही आमदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने चौथ्या जागेवरही उमेदवार उतरवण्याची चाल खेळल्यास त्यांना विजय मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT