Ramdas Kadam Sarkarnama
मुंबई

Kadam Vs Kirtikar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रामदास कदमांचे एक पाऊल मागे; म्हणाले, 'कीर्तिकरांसोबतचा वाद...'

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेनेच्या शिंदे गटातील दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाने चांगलाच वाद रंगला. रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकमेकांना गद्दार म्हणत वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी केली. त्यांच्या या वादाची चर्चा महाराष्ट्रभर झाली. मात्र, यानंतर या दोन्ही नेत्यांमधील वादाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

रामदास कदम यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा टाकण्याचा सल्ला दोघांनाही दिला. तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रामदास कदम यांनी नरमाईची भूमिका घेत गजानन कीर्तिकर यांच्यासोबत सुरु झालेला वाद आता 100 टक्के मिटला असल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षातील दोन नेत्यांमध्ये सुरु झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हस्तक्षेप करत सोमवारी खासदार गजानन कीर्तीकर यांना भेटीला बोलावत चर्चा केली. त्यानंतर आज रामदास कदम यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर चर्चा केली. यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण आपली खदखद मुख्यमंत्र्यांना सांगितली असून या वादावर आता पडदा पडल्याचे सांगितले.

"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की, कीर्तीकरांनी आधी तुमच्याकडे यावे, थेट माध्यमांसमोर जाऊ नये, याबाबत त्यांना सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एकाच पक्षात दोन नेत्यांमध्ये वाद हा भूषावह नाही, त्यामुळे भविष्यात आमच्यात राजकीय वाद होणार नाहीत", असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.

"मी खूप लढलो. अनेकांनी माझा मर्डर करण्याच्या सुपाऱ्या घेतल्या. साळसकर येथे नाहीत, पण ते याचे साक्षीदार आहेत. मला महाराष्ट्र निष्ठावान म्हणून पाहतो. त्यामुळे रामदास कदमांना राजकारणातून संपवण्यासाठी एखादी प्रेसनोट काढणं हे कितपत योग्य आहे ? गद्दार म्हणणं कितपत योग्य आहे ?", असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.

कदम - किर्तीकर यांच्यातील वादाचे कारण काय ?

मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत. मात्र, रामदास कदम यांनी या मतदारसंघावर मुलासाठी दावा केला. तसेच कीर्तीकरांचे वय झाले असून त्यांनी या मतदारसंघातून लढू नये, असे मत व्यक्त केले. एवढंच नाही तर कीर्तीकर पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, असा आरोपही केला. यावरुन या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला होता.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT