Ramdas kadam-Siddesh Kadam-Eknath Shinde
Ramdas kadam-Siddesh Kadam-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam : रामदास कदमांना कोणत्या गोष्टीचे दुःख आजही सलते; शिंदेंच्या कोणत्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी!

Vijaykumar Dudhale

Mumbai, 23 June : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी माझा मुलगा सिद्धेश कदम यांना उमेदवारी दिली नाही, याचं दुःख मला आजही आहे. पण सिद्धेश कदम यांनी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली असती तर किमान एक लाख मतांनी निवडून आले असते, असा दावा माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात (Mumbai North-West Lok Sabha Constituency) दोन्ही शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार समोरासमोर होते. शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव केला हेाता. त्या निकालाबाबत शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) न्यायालयात गेल आहे, त्यामुळे त्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत अजूनही लोकांना उत्सुकता आहे.

रामदास कदम म्हणाले, मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून माझा मुलगा सिद्धेश कदम यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत असलेली युती तुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिद्धेश कदम यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करण्याची सूचना केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिद्धेश कदम यांनी या मतदारसंघात मोठे काम केले होते. ते काम त्यांनी शिवसैनिक म्हणून केले होते, रामदास कदम यांचा मुलगा म्हणून केले नव्हते. मध्यंतरी मी एक स्टेटमेंटही केलं होतं की, गजानन कीर्तीकर मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत नसतील तर माझा मुलगा सिद्धेश कदम या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

रामदास कदम म्हणाले, माझा मुलगा सिद्धेश कदम याला डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी का दिली, या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालं नाही आणि मीही एकनाथ शिंदे यांना विचारलं नाही आणि मी विचारणारसुद्धा नाही. सिद्धेश कदम यांनी मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली असती तर ते एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आले असते. मला हे बोलायचं नव्हतं; पण तुम्ही मला यावर बोलायला भाग पाडले.

सिद्धेश कदम यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू द्यावी, अशी मी मागणी केली होती. कारण, गेल्या दहा वर्षांत त्यांनी या मतदारसंघात काम केले होते. सिद्धेशला उमेदवारी मिळाली नाही, याचं दुःख मला आहे. पण मी एकनाथ शिंदे यांना विचारलं नाही कारण मी आणि एकनाथ शिंदे हे जवळचे नातेवाईक असून त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे माझे जावई असून माझ्या चुलत भावाची मुलगी त्यांना दिली आहे, हे गुपितही रामदास कदम यांनी फोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT