Rashmi Shukla Sarkarnama
मुंबई

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांविरोधात काँग्रेस आक्रमक; पोलिस महासंचालकपदावरून हटविण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

Vijaykumar Dudhale

Mumbai, 27 September : ‘फोन टॅपिंग’चे आरोप झालेल्या रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलिस महासंचालकपदावरून तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयागोच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेषतः काँग्रेस पक्ष शुक्ला यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी आग्रही आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Central Election Commission) पथक दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवारी (ता. 27 सप्टेंबर) रात्री मुंबईत दाखल झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते राज्यातील प्रमख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याबाबत तक्रार करत त्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर राहिल्या तर त्या आपल्या पदाचा गैरवापर करतील, अशी तक्रार करून त्यांची इतर विभागात तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्ष यांनी ही मागणी केली आहे.

रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून तातडीने हटविण्यात यावे. तसेच, एकाच पोलिस ठाण्यात अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात यावी. कारण ते आपल्या पदाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडू शकतात, असेही काँग्रेस नेत्यांनी म्हटलेले आहे.

दरम्यान, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांपूर्वी पत्र लिहून रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी केली हेाती. त्यामुळे शुक्ला यांना पदावरून हटविण्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यानंतर अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी या काळात रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केले, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता.

विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आले होते, असा आरोप या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात केला होता. त्यांचा रोख हा राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या सुटीवर होत्या. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना या प्रकारणात क्लीन चिट मिळाली आहे, त्यानंतर त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पोलिस खात्याची धुरा दिला आहे. त्यांना थेट राज्याचे पोलिस महासंचालक करण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT