Devendra Fadnavis-Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे एक मिनिट मागत राहिले; पण सत्ताधाऱ्यांनी शेवटपर्यंत त्यांना मुख्यमंत्र्यांचे आभार मानूच दिले नाही

Maharashtra Budget Session : आदित्य ठाकरे हे एक मिनिट द्या, अशी विनंती करत होते. मला एक मिनिट द्या, फक्त आभार मानू द्या, असे ते म्हणत होते. विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 06 March : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात ‘मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे, असे काही नाही,’ असे विधान केले. तो मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे,’ असे ठणकावले. त्यांचे आभार मानण्यासाठी उठलेले आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांनी सभागृहात बोलूच दिले नाही. सत्ताधाऱ्यांचा गोंधळ पाहून विधानसभा अध्यक्षांनी शेवटी सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब केले.

आरएसएसचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मी भय्याशी जोशी यांचे विधान ऐकलेले नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून घेऊन त्यावर मी बोलेन. पण सरकारची भूमिका पक्की असून मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारची भूमिका ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या या वक्तव्यासंदर्भात भय्याजी जोशी यांचंही काही दुमत असेल असं वाटत नाही.

मी सरकारच्या वतीने पुन्हा सांगतो की, मुंबई मराहाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. इतर भाषांचाही इथे सन्मान आहे. आम्ही कुठल्याही भाषेचा अपमान करणार नाही. कारण जो स्वःतच्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो. तो सन्मान आहेच. पण आमच्या सरकारची भूमिका पक्की आहे, सरकारची भूमिका ही मराठी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भय्याजी जोशी यांच्या विधानावर स्पष्टीकरण देताना महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्याबाबत माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) हे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो. आमचं हेच म्हणणं आहे की... तेवढ्यात विधानसभा अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं तोडत आता आपण पुढं गेलो आहोत, असं सांगितलं.

विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतरही आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायचं आहे, असे सांगत होते. पण आता सगळेच हे चालू करणार, असे सांगत पुढे जाण्याची सूचना केली. त्यानंतरही आदित्य ठाकरे हे एक मिनिट द्या, अशी विनंती करत होते. मला एक मिनिट द्या, फक्त आभार मानू द्या, असे ते म्हणत होते. विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का, असा सवाल त्यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी आपण मांडलेले आभार मी रेकॉर्डवर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो, असे स्पष्ट करत ठाकरेंना बोलण्याची परवानगी नाकारली.

अध्यक्षांनी परवानगी नाकारल्यानंतर सत्ताधारी विशेषतः मंत्री नीतेश राणे यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी कोटी करत नीतेश राणे त्यांनी तुमचे आभार मानले नाहीत, मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत, तुम्ही खाली बसा असे सांगितले. त्यानंतरही दोन्ही बाजूंनी गोंधळ वाढत गेला. सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे आभार मानूच दिले नाहीत. वाढलेल्या गोंधळाकडे विधानसभा अध्यक्ष हतबल होऊन पाहत राहिले. गोंधळ थांबत नसल्याने त्यांनी अखेर विधानसभा काही काळासाठी तहकूब केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT