Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांप्रमाणे वरातीत नाचणार का? राऊतांचे भाजपवर टीकास्त्र...

Amol Sutar

Mumbai News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षण, पंजाबमधील शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. या वेळी सरकारमधील मंत्री नाचत आहेत आणि मनोज जरांगे उपोषण करत आहेत. हे असं नाचून प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा प्रश्न सुटला असून, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागावाटप झालेले असेल, असा दावा त्यांनी केला आहे.

सध्या पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ते वाढत चालले असून, सरकारने त्यांना दिल्लीपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर केला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या एमएसपी याशिवाय इतर काही मागण्या आहेत. देशामध्ये हमीभाव हा खूप महत्त्वाचा मुद्दा आज आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वतीने दिल्लीतील काही शेतकरी नेत्यांशी माझी चर्चा झाली. या वेळी शेतकऱ्यांचे नेतृत्व पंजाबमधील शेतकऱ्यांकडे आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी सरकाने पॅरामिलिटरी, सशस्त्र सेना दल, पोलिस तैनात केले आहेत. तरी शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

ज्या पाच शेतमालाच्या बाबततीत पीयूष गोयल यांनी एमएसपीसंदर्भात जो प्रस्ताव ठेवला आहे. तो शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. तो संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी योग्य नाही. देशातील राज्यानुसार शेतकरी आणि त्यांच्या उत्पादनाविषयी प्रश्न वेगवेगळे आहेत. अशा वेळेला देशातील शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि या विषायावरती सरकारकडे मागणी करावी, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकरी जर दिल्लीची सीमा ओलांडून पुढे गेले, तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केली आहे, अशी माझी माहिती असल्याचे राऊत यांनी सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत दिल्लीच्या दिशेने शेतकऱ्यांना येऊ द्यायचं नाही, असे सरकारने ठरवलं आहे. शेतकऱ्यांचे मुडदे पडले तरी चालतील, पण शेतकऱ्यांना एमएसपीचे पैसे देण्यासाठी सरकार तिजोरीत हात घालणार नाही. सरकारकडे इलेक्टोरल बॉन्डच्या रूपाने भरपूर पैसे आहेत. भाजपकडे पीएम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये पडले आहेत. अदानीला देण्यासाठी हजारो कोटींचे व्यवहार होत आहेत, पण शेतकऱ्यांच्या एमएसपीसाठी लागणारे सव्वा दोन लाख कोटी रुपयांची सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही. त्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठला आहे. त्यानंतर हळूहळू उत्तर प्रदेश हरियाणा, सिंधी पट्ट्यातील शेतकरी पुढे जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. याविषयी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो, ते इतर नेत्यांशी चर्चा करतील. महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे. दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या खासदार भारती पवार यांच्या विरोधात कांदा उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र आणि पंजाबच्या उत्पादनावर देशाचं पोट भरलं जातं, पण त्यांचीच फसवणूक होत असल्याचा आरोप राऊत यांनी भाजप सरकारवर केला आहे.

भाजप फसवाफसवीच्या पायावर उभा असलेला पक्ष...

मराठा आरक्षण म्हणजे सरकारचा फसवाफसवीचा खेळ आहे. मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौरपदापर्यंत फसवासवी सुरू आहे. भाजप हा फसवाफसवीच्या पायावर उभा आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मनोज जरांगे यांनी आज प्रमुख लोकांची बैठक बोलावली आहे. आज आंदोलनाची पुढील दिशा मांडतील. सरकारने 10 टक्के आरक्षणाचा प्रकार केला, तो मराठा समाजाला मान्य नाही. सरकार त्यांचे समाधान करू शकले नाही.

उद्या जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे. मंत्री नाचताहेत रस्त्यावर आणि जरांगेंचं उपोषण सुरू आहे. हा मराठा समाज अस्वस्थ आहे. हे असं नाचून प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT