Mumabi, 03 August : राज्याचे पर्यटन मंंत्री शंभूराज देसाई यांनी आज (ता. 03 ऑगस्ट) मुंबईतील मेघदूत बंगल्यात गृहप्रवेश केला. मेघदूत बंगल्याशी देसाई कुटुंबीयांच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. शंभूराज यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांनी मुलगा शंभूराज देसाई यांच्याविषयी बोलताना ‘शंभूराजला मला कलेक्टर करायचं होतं. पण, तो होऊ शकला नाही, आज तो कलेक्टरपेक्षा मोठा झाला आहे,’ असे विजयादेवींनी गौरवाने सांगितले.
विजयादेवी देसाई म्हणाल्या, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचा जन्म मेघदूत बंगल्यातील आहे. आमदार करता करता त्याचे वडिल गेले. मी त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला चेअरमन केले. तुला राजकारणात घातलं. वडिलांचं, आजोबांचं नाव येईल, असं तू काम कर, असे सांगितलं. त्याप्रमाणे त्याने काम केले. खूप संकटातून गेला. आम्हाला अनेक वेळा पराभव पत्करावा लागला. पण त्याने लहान वयात हार पत्करली नाही.
त्यांनी एवढचं ठरवलं की, आपल्या आईची इच्छा आहे की, आपले वडिल आमदार होऊ शकले नाहीत, आपण व्हावं. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली. संपूर्ण पाटण तालुक्याच्या आशीर्वादाने तो आमदार झाला, मंत्री झाला. यामुळे मी खूप समाधानी आहे. मेघदूत बंगल्यात त्याला यायचं होतं. मी त्याला सांगितलं की, पवनगड मिळाला आहे, पण माँ तुमची इच्छा आहे, मी मेघदूत घेतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो, असे त्यांनी सांगितले होते, हेही विजयादेवी देसाई (Vijayadevi Desai ) यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्याने मेघदूत बंगल्यात आणले. याबाबत मला काहीही कल्पना नव्हती. पण शंभूराज देसाई यांनी माझा वाढदिवस मेघदूत बंगल्यात साजरा केला. आपला मुलगा एवढा कर्तृत्ववान आहे, हे बघायला त्यांचे वडिल बिछान्यावर असते तरी मला समाधान वाटलं असतं. त्याच्या वडिलांइतकं मी त्याला देऊ शकत नाही. पण पाटण तालुक्यानं दिलं आहे.
लग्न झाल्यानंतर माझा गृहप्रवेशच मेघदूत बंगल्यात झालेला आहे. योगायोगाने शंभूराजचा जन्मही मेघदूत बंगल्यातच झाला आणि आज तो या बंगल्यात मंत्री म्हणून राहतो, यापेक्षा भाग्य काय पाहिजे. बाळासाहेब देसाई मनाने कणखर होते. पण ते तितकेच मायाळू होते. मला त्यांनी डिलिव्हरीसाठी नाशिकला माझ्या माहेरी पाठवले नाही. आदल्या दिवशी ते विमानाने अधिवेशनासाठी नागपूरला गेले, दुसरा दिवशी शंभूराजचा जन्म होताच, ते सर्व सोडून मुंबईत आले. आईवडिलांपेक्षा जास्त माया मला माझे सासरे बाळासाहेब देसाई यांनी दिली, अशी आठवणही विजयादेवी देसाईंनी सांगितली.
विजयादेवी देसाई म्हणाल्या, वडिलांच्या आणि आजोबांच्या नावाला कमीपणा येईल, असं काही करू नका, असे मी शंभूराज देसाईंना आवर्जून सांगायचे. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनी माझं ऐकलं आणि चांगले झाले. माझ्या सासऱ्यानं माझं खूप केलं. यावेळी ताईसाहेब असत्या तर माझं याहून अधिक कौतुक केले असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.