Anand Paranjpe Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : 'ठामपा'च्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? शरद पवार गटाचा अजित पवार गटावर निशाणा

Pankaj Rodekar

Thane Political News : आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले. महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे-मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पीटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? याचे उत्तर परांजपे-मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले.

जो नाही झाला बापाचा; जो नाही झाला ठाकरे-शिंदेंचा; जो नाही झाला आव्हाडांचा, तो काय होणार अजित पवारांचा? असा सवाल देसाईंनी केला. ते म्हणाले, आनंद परांजपेंना (Anand Paranjape) महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्व नाही. त्यामुळेच ते जितेंद्र आव्हाडांवर उठसूठ टीका करून महत्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे सबंध ठाण्याला माहीत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंब्रातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत सबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसे काय सांगितले होते? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा (Mumbra) येथील इसमाला कोणी दिली होती? कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा ! कार्यालयातील खाणं-पिणं, नाश्ता याचे पैसे कुठून जायचे? तेव्हा याच जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते. याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला.

परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत

गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंगल्यावर नेली होती. पण, त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचीतसा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किमंत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विक्रम खामकर यांनी केली.

परांजपे रिकामे भांडे

रिकाम्या भांड्याचा मोठा आवाज येत असतो. आनंद परांजपे हे असेच रिकामे भांडे आहे. अशी टीका प्रवक्त्या रचना वैद्य यांनी केला. ठाण्यातील स्वतःचे नाव उंच करण्यासाठी परांजपे हे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करीत आहेत. पण, त्यांना त्यांचेच लोक गांभीर्यपूर्वक घेत नाहीत, हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असेही त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT