Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'भाजपमुळे राज्याची संस्कृती बिघडली, काही टोळ्या...'; संजय राऊतांचा निशाणा

Ganesh Thombare

Mumbai News : 'भाजपमुळे राज्याची संस्कृती बिघडली असून, भाजपने यासाठीच काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत,' असा गंभीर आरोप करत चिपळूणमध्ये झालेल्या राजकीय राड्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्राची संस्कृती लयाला चालली असून, याला जबाबदार फक्त फडणवीस, शाह, मोदी आणि त्यांचा पक्ष असल्याचा आरोपही राऊतांनी केला. (Shivsena MP Sanjay Raut On BJP)

याबरोबरच त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य करत मोदी सरकारवर निशाणा साधला. देशातील विविध शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी मोदी सरकारविरोधात पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं असून, 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत, तर त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे, काटेरी तारांचे कुंपण आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या आंदोलनाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी जेलची उभारणी करू शकतात, रस्त्यावर बंदूक घेऊन हजारो पोलिस तैनात करू शकतात. मात्र, पाचशे कोटी रुपयांचं नुकसान होत आहे, त्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विषय हाताळायला तयार नाही. पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटीच्या जाहिराती पुन्हा सुरू झाल्या आहेत, मग शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी का देत नाहीत ? 500 कोटींचं नुकसान जर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे होत असेल, आता या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे; मग मोदी काय करत आहेत," असा सवाल राऊतांनी केला.

"भारतीय जनता पक्षामुळे राज्याची संस्कृती बिघडली असून, भाजपने काही टोळ्या हायर केल्या आहेत. टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. या महाराष्ट्रात एक थोर परंपरा होती. पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती, पण यावर आता भाजपच्या भाडोत्री लोकांकडून नशेच्या गुळण्या टाकण्याचं काम होत आहे," अशा कठोर शब्दांत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

"आम्हीसुद्धा कठोर शब्दांचा वापर करतो. बाळासाहेब ठाकरेदेखील कठोर शब्दांचा वापर करायचे. अनेक कठोर शब्द आम्ही वापरले. आमच्याकडून एखादा-दुसरा शब्द चुकीचाही जात असेल, पण ज्या पद्धतीने भाजपने जो दारुखाना सुरू केला आहे, ते पाहता महाराष्ट्राची संस्कृती लयाला जात आहे. मी कोणत्या व्यक्तीचे नाव घेत नाही. पण याला जबाबदार फडणवीस आणि अमित शाह, मोदी आणि त्यांचा पक्ष आहे," असा घणाघात राऊतांनी केला.

Edited By-Ganesh Thombare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT