Ajit Pawar Vs Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Vs Vikhe Patil : अजित पवार अन्‌ विखे पाटील यांच्यात खडाजंगी; अर्थमंत्री म्हणाले ‘निधी आणायचा कोठून...’

Vijaykumar Dudhale

Mumbai, 24 September : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंच्यामध्ये दुधाच्या अनुदानावरून जोरदार खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतच या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये तू तू मै मै रंगल्याने उपस्थित इतर मंत्री आणि अधिकारीही अवाक झाले. यापूर्वीही अजित पवार यांचा मुख्यमंत्री, तसेच भाजपच्या मंत्र्यांसोबत वाद झाला होता.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting ) सोमवारी (ता. 23 सप्टेंबर) झाली. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुग्धविकास आणि पशुसंवर्धन विभागाकडून दुधाला पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र हा मूळ प्रस्ताव हा दहा रुपये अनुदान देण्याचा होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यासाठी निधी कसा उभा करायचा, असा प्रश्न उपस्थित केला.

राज्यात अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. अनुदानासाठीची रक्कम कोठून आणायची. कारण बऱ्याच योजनांवर पैसा खर्च झालेला आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करता एवढं अनुदान देणं उचित ठरणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. त्यावर राज्याचे महसूल तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काही मंत्र्यांनी आपत्कालीन फंडाचा उपयोग करण्यात यावा, असा उपाय सुचविला होता. मात्र, त्यास अर्थ विभागाने स्पष्टपणे नकार कळविला आहे. त्यावर दोन्ही बाजूकडून वाद प्रतिवाद रंगला. शेवटी दहा रुपयांऐवजी दुधाला सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

यापूर्वीही झाले वाद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यापूर्वीही निधीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतही वाद झाला होता. आता त्यांचा पुन्हा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत वाद झाला आहे, त्यामुळे निधीवरून राज्याच्या मंत्रिमंडळात जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे.

सर्व मंत्र्यांचे अर्थमंत्र्यांशी भांडण : जयंत पाटील

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीतील अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वादावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, सरकारची तिजोरी साफ झालेली आहे. अर्थमंत्री प्रत्येक प्रस्तावला नाही म्हणण्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाहीत. सर्व मंत्री अर्थ खात्यावर आणि अर्थमंत्र्यांशी टोकाची भूमिका घेऊन भांडण करत आहे. प्रत्येक आठवड्याच्या कॅबिनेटनंतर ते आपल्या सर्वांच्या समोर येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT