Uddhav Thackeray Speech  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Speech : '...तर भेकड-भाकडांनो जरुर मिंधे गटात जा'; पक्ष सोडणाऱ्यांना 'ठाकरी इशारा'!

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेनेत अभूतपुर्व अशी फूट घडल्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेत प्रवेश केला. यामुळे शिंदे यांचे पारडे जड होऊन विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण बहाल केले. नुकतंच ठाकरे गटाचे एक ताकदवान आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, अशी माहिती समोर येत होती. या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंनी 'ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्या भेकडांनी जरुर मिंधे गटात जावे,' असे थेटपणे सांगितले आहे. त्यामुळे आता ठाकरेंचा आणखी एक मोठा नेता शिंदे गटात जाणार का? या चर्चांना बळ मिळत आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे आज मंबईच्या मेळाव्यातील भाषणात म्हणाले, "आपल्याला धर्माचा ध्वज वाचवायचा असेल आणि भारत मातेला वाचवायचं असेल, तर आपल्याला जिद्दीने आणि त्वेषाने उभं राहावे लागेल. जे संकट येईल त्या संकटाच्या छाताडावर चालून जाण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल. तर आणि तरच आपण 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' बोलू शकतो. नाहीतर जसे भेकड तिकडे गेलेले आहेत, तसे अजूनही काही भेकड माझ्या शिवसेनेत असतील, तर भेकडांने तु्म्ही मिंधे गटात सरळ जा, तुमची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही. भेकड-भाकड असतील त्यांनी जरुर मिंधे गटात जावे, असा थेट इशारा ठाकरेंनी दिला.

जीएसटीवरुन मोदी सरकारचा समाचार -

मुंबईतील स्थानीय लोकाधिकारी समितीच्या अधिवेशनात ठाकरेंनी मोदी सरकारसह (Modi Government) भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले. जीएसटीतून केंद्र सरकारला जाणाऱ्या कराच्या पैशाबाबत ते म्हणाले, "मोदी गॅरंटीमध्ये बराचसा पैसा महाराष्ट्राच्या कष्टाचा आहे. महाराष्ट्राला फक्त सात पैसे मिळतात. जो एक रुपया आम्ही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकारला देता, त्यातील 50 टक्के वाटा महाराष्ट्राला मिळायलाच हवा. महाराष्ट्राला पूर्णपणे लुळंपांगळं करण्याचा प्रयत्न होत आहे. आता आम्हाला हक्काचा पैसा मिळाला पाहिजे. सत्ता आल्यानंतर त्याबाबतचा कायदा बदलण्यासाठी माझा आग्रह राहील." (Shiv Sena Political News)

राजकारणासाठी भारतरत्न...

भारतरत्न ज्यांना जाहीर झाला, त्यांचे कर्तृत्व मोठे आहेच. भारतरत्न किती द्यायची, कुणाला द्यायची याचं एक सूत्र आहे. पण आले मोदींच्या (PM Narendra Modi) मना... असे सुरू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या भारतरत्न दिली जात असल्याची टीका ठाकरेंनी केली. कर्पूरी ठाकूर यांना मतांसाठी भारतरत्न पुरस्कार दिला. एम. एस. स्वामीनाथन यांनाही त्यासाठीच दिला. त्यांनी दिलेल्या अहवालाचीही अंमलबजावणी करा, अशी आमची मागणी आहे. काही दिवसांत आणखी भारतरत्न जाहीर करतील," असे ठाकरे म्हणाले. (Latest Political News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT