Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Fadnavis : फडणवीसांचं ज्ञान काढत उध्दव ठाकरेंचा जशास तसा पलटवार; म्हणाले, '' वटहुकुम हा राज्य नाही तर...''

Deepak Kulkarni

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकल्यानंतर ठाकरे दीड वर्ष मुख्यमंत्री होते, अध्यादेश निघू शकत होता तर त्यांनी का काढला नाही? असा सवाल केला होता.

आता फडणवीसांच्या टीकेवर उध्दव ठाकरेंनी जशास तसा पलटवार केला आहे. त्यांनी फडणवीसांचं ज्ञान हे फारच तोकडं असून वटहुकुम हा राज्य नाही तर केंद्र सरकार काढत असते असं प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे गटाने भाजपला अहमदनगर जिल्ह्यात मोठा धक्का देतानाच माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. साजन पाचपुते सोमवारी आपली आई आणि इतर कुटुंबियांसह 250 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले. पाचपुते यांचा 'मातोश्री'वर पक्षप्रवेश पार पडला. यानंतर उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray) नी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर टीका केली.

ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असं मला वाटलं नव्हतं. वटहुकुम हा केंद्र सरकार किंवा संसद काढत असते. जसं दिल्लीतला वटहुकुम हा तिथल्या सरकारने नाही तर केंद्राने फिरवला. हा अधिकार केंद्राचा आहे. मी देवेंद्र फडणवीसांना थोडंफार ज्ञान असेल असे वाटले होते. पण ते आता मंत्रालयाच्या आसपास फिरकायच्या पण कुवतीचे नाहीत असा हल्लाबोल ठाकरेंनी फडणवीसांवर केला.

उध्दव ठाकरेंनी एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. तसेच वटहुकूम हा केंद्र सरकार काढत असते. राज्य सरकार नाही असा पलटवार ठाकरेंनी फडणवीसांवर केला.

तसेच अजितदादांना मी हुशार समजत होतो. तर फडणवीसांचं ज्ञान तोकडं आहे, यापुढे महाराष्ट्रात कुणी न्याय हक्कासाठी आंदोलन केले, रस्त्यावर उतरले तर तुमचे डोके फोडून टाकू असा कारभार या सरकारचा सुरु आहे. बारसूत देखील सरकारने महिला वगैरे न पाहता लाठीचार्ज केला होता. तीन तिघाडा काम बिघाडा असे हे सरकार आहे अशी टीकाही ठाकरेंनी सरकारवर केला.

आत्ता पण या सरकारने अमानुष लाठीमार केला आहे. त्याची जबाबदारी कुणी घेणार आहेत की नाही, आदेश कुणी दिला. पोलीस म्हणणार की, आम्ही लाठीचार्ज केला नाही. मग कुणी हल्ला केला. मी जातीपाती काय बघणार नाही. पण मग एक फुल दोन हाफ यांनी न जुमानता जर आदेश निघत असेल तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही. ते त्या खुर्चीवर बसण्याच्या क्षमतेचे नाहीत. हे सरकार चालविण्याच्या कुवतीचे नाहीत. हे नालायक आहे असाच याचा अर्थ होतो. आणि यांनी म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.

जालन्यात बेछूट लाठीचार्ज केला. मी तिथे जाऊन पाहिलं. आपलं पण सरकार होतं, पण आपल्या सरकारवेळी लाठीचार्ज झाला का. बारसुला देखील असंच लाठीचार्ज केला, हे सरकार स्वत:ला हिंदुत्वाचं सरकार मानतं,पण या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर लाठ्या मारतं, केला जातो हे काय मला पटत नाही. हम करे सो कायदा अशा सरकारला तोडून मोडून टाकायचं आहे. तुमच्या इथे जाहीर सभा घ्यायची आहे असेही ठाकरे म्हणाले.

तसेच पक्ष फोडायचा...कोणी आंदोलन करत असतील तर त्यांना मारायचं हे या सरकारचं काम आहे. अजितदादा(Ajit Pawar) यांना समजदार समजत होतो. मी संघनायक होतो, मी चुकत होतो तेव्हा हे विकेट किपर काय करत होते अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT