Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Rumours: ...तोपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही; अजितदादांकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar on BJP Entry : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी स्वाभिमानातून केली आहे. त्यावेळेपासून पक्ष कधी सत्तेत होता कधी नव्हता. या चढउताराच्या काळात आम्ही सर्वांनी पक्षवाढीसाठी एकदिलाने काम केले. यापुढेही जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार आहे. मी पक्षात राहणार असून इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. तसे आता अॅफिडेव्हीट करून देऊ का? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

गेल्या काही दिवासांपासून अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह भाजपमध्ये (BJP) दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान त्यांनी मी कुठेही जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र दिवसेंदिवस त्या चर्चा वाढत होत्या. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी विधानभवन परिसरातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कुणाच्याही सांगण्यावरून एखाद्याला त्रास होईल अशा चर्चा न करण्याचे माध्यमांनाही त्यांनी आवाहन केले आहे.

अजित पवार म्हणाले, "सध्या माध्यमात ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचा कणा असलेला कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुठलेही कारण नसताना माझ्याबद्दल किंवा सहकाऱ्यांबद्दल वाद निर्माण करण्याचे काम जाणीपूर्वक चालले आहे. आमच्याकडे एकाही आमदाराच्या सहीचे पत्र नाही. इतर पक्षांचे नेते त्यांची मते व्यक्त करून त्यांचे काम करतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेमधून (NCP) मी बाहेर पडेन या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही."

आमदार त्यांच्या कामांसाठी नेहमीप्रमाणेच भेटीला आल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "माझ्या कार्यालयात आमदार समितीच्या बैठका होत असतात. आज सर्व आमदार नेहमीप्रमाणेच आलेले होते. काही त्यांची कामे घेऊन आले होते तर काहींना माझ्या कामासाठी बोलावले होते. त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यांच्या मतदारसंघातील कामे मार्गी लागणे महात्वाचे असते. मात्र 'ध' चा 'म' करून ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यामुळे माझ्यासह सहकार्यांना त्रास होत आहे. कुणाच्याही सांगण्यावरून अशा चर्चा करू नये."

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही काळजी करू नये, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. अजित पवार म्हणाले, "सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी, बाजारभावाअभावी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली अडचण असे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी इतर पक्षांकडून बिनकामाच्या चर्चा घडवून आणण्याचे काम करीत आहे. मात्र मी कुठेही जाणार नसून कुणीही काळजी करण्याची गरज नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT