Bharati Pawar sarkarnama
नाशिक

Onion Farmers politics : राज्यमंत्री भारती पवारांचा मतदारसंघ होऊ पाहतोय शेतकरी आंदोलनाचे केंद्र!

सरकारनामा ब्यूरो

-हर्षल गांगुर्डे

Nashik farmers Politics : कांदा, द्राक्ष, टाेमॅटोसह सर्वच शेतमालाला मिळालेले कवडीमोल भाव, बेरोजगारांचे प्रश्न, त्यात दुष्काळाचा जीवघेणा दाह आणि दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यात राहुल गांधींची एन्ट्री आगामी काळातील राजकीय, सामाजिक पटलावर छाप सोडतील का? शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमांवर राहुल गांधींच्या संवादाचा काय परिणाम होतो? हा संवाद शेतकऱ्यांना भावला तर आगामी काळातील मतांच्या गणितावर काय परिणाम होईल? या आणि अशा अनेक गोष्टींमुळे आज चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राहुल गांधी यांची होणारी सभा महत्त्वाची ठरणार आहे.

चांदवड तालुका हल्ली शेतकरी चळवळीचे केंद्र बिंदू झाला आहे. इतिहासात देशपातळीवर गाजलेल्या शरद जोशी यांच्या शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी तालुक्याला आहे. घरची चटणी भाकरी बांधून या आंदोलनाला लाखो महिलांनी केलेली गर्दी आजही अनेक आंदोलनांना प्रेरणा देते. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार स्व. जयचंद कासलीवाल यांनी केलेले उपोषण, कांदा निर्यातबंदीवरून शरदचंद्र पवार यांनी आंदोलनासाठी चांदवडची केलेली निवड, काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केलेला रास्ता रोको, मोर्चे अनेक कारणांनी चांदवड तालुका कायम चर्चेत राहिलेला आहे.

शेतीमालाला मिळणारा कवडी मोल भाव, दुष्काळ, बेकारी या साऱ्याला पिचलेला इथला शेतकरी हवालदिल झाला आहे. विकासाच्या नावाने सुरू असलेला भुलभुलैया आता परवडणारा नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरत आहे. केंद्र सरकारचा विकास फक्त काँक्रिट रस्ते, चावड्या यातच अडकला असून, कृषिप्रदान संस्कृती मात्र मेटाकुटीला आली आहे. आजही तालुक्याला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो हे दुर्दैव आहे.

टोमॅटोला चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटो आयात केला. कांद्याला चांगला भाव मिळू लागताच निर्यातबंदी केली, द्राक्ष बागाईतदारांचे तर अक्षरशः कंबरडे मोडले. अशा अनेक घटना शेतकऱ्यांच्या हिताच्या नसल्याने राहुल गांधींचा चांदवड दौरा कुतूहलाचा ठरणार आहे. या सभेचा थेट परिणाम आगामी काळातील राजकीय पटलावर उमटला जाणार आहे. अर्थात संवाद शेतकरी प्रश्नांनी केंद्रित राहायला हवा.

दिंडोरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार भारती पवार (Bharati Pawar) यांनादेखील कांदा, द्राक्ष उत्पादकांना न्याय देण्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही. दुसरीकडे विजयाची हॅट्ट्रिक मारू इच्छिणारे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडून विकासकामांचा धडाका सुरू आहे. यापूर्वी विविध आंदोलनातून संजय जाधव, राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेना उद्धव ठाकरे गट नितीन आहेर, प्रहार चे गणेश निंबाळकर यांनी अनेकदा शेतकऱ्यांचा आवाज बनत मोठी आंदोलने तालुक्यात छेडली. मात्र, शेतकऱ्यांचा रोष आता राहुल गांधी ऐकणार असल्याने आजच्या सभेला विशेष महत्त्व आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चांदवड तालुक्यात ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

चांदवड तालुक्यात शेती, मातीचे प्रश्न गंभीर आहेत. २०१३ पासून आजपर्यंत चांदवड तालुक्यात ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. यात शासकीय लाभ मिळण्यासाठी २६ शेतकरी पात्र तर उर्वरित अपात्र ठरले आहेत. यात आत्महत्या केलेल्या सर्वात तरुण शेतकऱ्यांचं वय अवघे ३१ वर्षे आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT