Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Baramati Lok Sabha 2024 : धमकावलं असेल तर पोलिसांत तक्रार करा; अजितदादांचे पवारांना प्रत्युत्तर

Sudesh Mitkar

Pune, 09 April : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी बारामती आणि पुरंदर तालुक्यांतील गावांचा दुष्काळी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान सुपे येथे झालेल्या सभेत पवार यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून दमबाजीला घाबरू नका, असे ठणकावून सांगितले. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘कोणी जर धमकावलं असेल तर सरळ पोलिस कम्प्लेंट करा,’ असं उत्तर दिलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्व आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते, तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीनेच चालवायची असते. राजकारण करताना राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते, जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलिस त्याबाबतची कार्यवाही करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा आणि नाशिक जागेबाबत अजित पवार म्हणाले, सातारा आणि नाशिक जागेबाबत महायुतीतील नेते चर्चा करत असून, लवकरच त्याबाबत तोडगा निघणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नाराज असलेल्यांशी मी चर्चा केली असून, निवडणुकीमध्ये अशी नाराजी पुढे येण्यास स्वाभाविक असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुरंदरमध्ये होणाऱ्या महायुतीच्या सभेबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले, विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या समोर भूमिका मांडली होती, त्याचवेळी पुरंदरमध्ये शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती, त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी 11 एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. आम्ही बोलतो तसे वागतो, बदलत नाही, त्याप्रमाणे आम्ही शब्दाला जागून आम्ही तिघेही तेथे जाणार आहोत.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाने काय करावे, हे ज्याच्या त्याचा अधिकार आहे. राजकारणात अशा घटना घडत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिला आहे, त्यामुळे ते तो बजावतात.

लोकांना पटेल असं बोला : राऊतांना टोला

संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आहे, असे म्हटले आहे. त्यावर मिश्किलपणे हसत पत्रकारांनाच तुम्हाला तरी खरंच असं वाटतं का, असा प्रतिप्रश्न करत ते म्हणाले, एकवेळ नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई आहे, असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते. पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्यामुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे, असा सल्लाही अजित पवार यांनी संजय राऊत यांना दिला.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT