Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : मतदान संपताच शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाले...

Deepak Kulkarni

Shirur Loksabha News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांतील मतदान सोमवारी पार पडले. महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ यांसह एकूण अकरा मतदारसंघांचाही समावेश होता.यात शिरूर मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासून ते आजच्या मतदानादिवशीपर्यंत चुरशीचा राहिला.

शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली आहे. पण आता मतदानसंपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत 50.50 टक्के मतदानाची नोंद झाली तर शिरूर लोकसभेमध्ये 47.50 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळ लोकसभेमध्ये 52.30 टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान,अंतिम आकडेवारी आल्यानंतर यामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.मतदानानंतर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao Patil) यांनी विजयाचा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शिरूरसाठी शरद पवार गटाकडून तिकीट मिळवलेल्या अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार आक्रमक झाले होते. त्यांनी कोल्हेंच्या पराभवासाठी चक्क शिवसेनेच्या आढळराव पाटलांना पक्षात आणून उमेदवारी दिली.तसेच कोल्हेंना पराभूत करण्याचा विडाच उचलला.पण कोल्हेंसाठी पवार ढाल बनले.पवारांनी आपली पूर्ण ताकद लावून आढळराव पाटलांसमोर तगडं आव्हान उभं केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता अमोल कोल्हेंनी मतदान संपल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.सध्या राजकीय वर्तुळात ती चर्चेचा विषय ठरत आहे.या पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि मतदारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.ही निवडणूक शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने हातात घेत संपूर्ण देशाला संघर्षाचा संदेश दिला.आपलं हे योगदान आम्हाला कृतज्ञ करणारं असल्याचं ते पोस्टमध्ये म्हणतात.

कोल्हे पोस्टमध्ये म्हणतात,मतदार बंधू-भगिनींनो, लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी होत आपण लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या अस्तित्वासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी बहुमोल मतांचं दान दिलं. ही निवडणूक शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने हातात घेत संपूर्ण देशाला संघर्षाचा संदेश दिला. आपलं हे योगदान आम्हाला कृतज्ञ करणारं आहे.

तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून आपलं चिन्ह, आपली भूमिका सर्व मतदारांपर्यंत पोहोचवली. आपल्या सर्वांची ही साथ आजन्म स्मरणात राहणारी आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीने मला पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली हे माझं भाग्य असल्याची भावनाही कोल्हेंनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT