Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील हे १६ तासांचा ‘शिरूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : रोज सहा तास शासकीय काम, दोन तास प्रशासकीय बैठक, दोन तास सरपंचांशी संवाद, एक तास विकासकामांचा आढावा आणि सायंकाळी चारनंतर संघटनेसाठी... असा प्रवासासह १६ तासांचा ‘शिरूर पॅटर्न’ (Shirur) तयार केला आहे. तो राज्यभर राबविणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. (Chandrakant Patil will implement the 16-hour 'Shirur Pattern' across the state)

सकाळी आठ वाजता विठ्ठलवाडीहून सुरू झालेला पाटील यांचा शिरूर तालुका दौरा रात्री दहा वाजता शिरूरमधील पोलिस दलातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चेने संपला. सोळा तासांपेक्षा कमी काम करीत नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शिरूर तालुक्यापासून सुरू केलेला हा प्रवासाचा शिरूर पॅटर्न महाराष्ट्रात लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले की, प्रत्येक तालुकानिहाय सरपंचांशी संवाद साधताना त्यांनी काय नवीन प्रयोग केले. विकासकामे करताना कोणत्या इनोव्हेटीव आयडीया वापरल्या याची आवर्जून दखल घेतली जाईल. सरपंच झाल्यानंतर सरकारकडून काय अपेक्षित आहे, याविषयीही त्यांच्याशी संवादातून जाणून घेतले जाईल. त्यानंतर लगेचच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल.

सरपंचांच्या कल्पना अधिकाऱ्यांना सांगताना, सरपंचांनी मांडलेल्या समस्या व अडचणींची सोडवणूकही अधिकाऱ्यांशी चर्चेतून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर शासकीय कामे व दुपारी चारनंतरची वेळ मात्र संघटनेसाठी दिली जाईल. तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावे व त्यानंतर लगेचच बूथ केंद्र प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांनी चर्चा, विचारविनिमयातून संघटन मजबूतीचे काम केले जाईल. दहा आठवड्यानंतर पुन्हा राऊंड घेत हाच कित्ता गिरवला जाईल. त्यातून कामे, भेटी कमी कमी होत जातील. सरपंच संवाद, अधिकारी बैठक एक तासावर येतील. आधीच्या कार्यक्रमात फोटो काढलेलेच असल्याने तो वेळ वाचत जाऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्यास हातभार लागेल, असेही त्यांनी सांगितले.

स्टेजवरील सर्वांची नावे घेत बसू नका

भाजप पदाधिकारी, बूथ व शक्ति केंद्र प्रमुखांच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे चांगलेच बौद्धिक घेतले. कुठलाही कार्यक्रम ४५ मिनिटे ते दीड तासांचा असावा. प्रत्येक वक्त्याने स्टेजवरील सर्वांची नावे घेण्याची गरज नाही. कारण स्टेजवर बसणारे मान्यवर असतात आणि त्यांना सगळेजण ओळखत असल्यानेच ते मान्यवर झालेले असतात. पाहुण्यांच्या स्वागतासाठी फटाके फोडणे बंद करावे. कारण त्यातून प्रदूषण व घातक कचरा होतो. तो प्राणी, पक्ष्यांच्या जीवावर बेततो. टाळ्यांचा कडकडाट फटाक्यापेक्षा अधिक होईल, याचा प्रयत्न करा.

फेटा बांधणे, हार घालणे, पु्ष्पगुच्छ देणे यात वाया जाणारा वेळ वाचविला पाहिजे. अनेकदा कार्यक्रमानंतर फेटे तेथेच पडलेले असतात. तो आयोजकाचा अपमानच आहे. कमी वेळात जास्त मुद्दे मांडता आले पाहिजेत. हार, गुच्छ, फेटे व शाल यासाठी हजारो रूपये खर्च होतात. ते वाचवून त्या पैशांनी गरीब शालेय विद्यार्थीनींना गणवेश घेऊन द्या. एका कार्यक्रमाच्या खर्चातून दहा ते वीस विद्यार्थीनींना गणवेश मिळू शकतो.

विरोधी पक्षाच्या लोकांनाही निधी देणार

राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले असून, त्याचा उपयोग सामान्य जनतेला करून द्या. लोकांची कामे करताना हा आपल्या पक्षाचा तो विरोधक असा भेद टाळा. पालकमंत्री या नात्याने राज्याच्या विकासनिधीबरोबरच जिल्हा नियोजन मंडळाचा भरीव निधी विकासकामांसाठी वापरण्याचे अधिकार आहे. तो भरभरून वापरताना विरोधी पक्षांच्या तक्रारीला वाव ठेवणार नाही. आपल्या कार्यकर्त्याला विकासात जास्त पाहिजे हे मान्य, पण विरोधी पक्षाच्या कुणाला निधी दिला तर त्याला का दिला, हे सांगू नका, तुम्हाला किती पाहिजे तेवढेच सांगा, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे बजावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT