पुणे

Devendra Fadnavis : 'जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ...' : देवेंद्र फडणवीसांचं विधान!

Mayur Ratnaparkhe

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करताना, प्रभू श्रीरामाच्या आहाराबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

हिंदुत्ववादी संघटनांसह सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय, राजकीय नेत्यांसह मंत्र्यांचीही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यात फडणवीसांना आव्हाडांच्या विधानावरून प्रतिक्रिया विचारलं असता, फडणवीस म्हणाले 'जितेंद्र आव्हाडांचं (Jitendra Awhad ) वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्यं आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी, 'बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ,' असं एक हिंदीमधील वाक्य आहे. अशा प्रकारे ते विधानं करीत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे.

'खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. बहुजनांचे, अभिजनांचे, दलितांचे, आदिवासींचे आहेत. असं कोण आहे बरं या देशात की ज्यांचे ते नाहीत आणि उगाचच मग ते शाकाहारी, मांसाहारी हे विनाकारण लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचं काम आहे.'

याचबरोबर 'माझा सवाल आहे, की आज आमचे वारकरी, धारकरी, माळकरी, टाळकरी हे सगळे बहुजन समाजातील आहेत. हे सगळे प्रभू श्रीरामाला मानतात आणि यामधील सगळे जण शाकाहारी आहेत. मग हा त्यांचा अपमान नाही का? त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता निर्माण होईल, असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे,' असं फडणवीसांनी सांगितलं.

याशिवाय 'मला आश्चर्य वाटतं, की जे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतात, असे लोक मात्र यावर मौन बाळगून आहेत. ते यावर काहीही बोलायला तयार नाही, याचा साधा निषेधही करायला तयार नाहीत. त्यामुळे हे किती बेगडी लोक आहेत, हे सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे,' असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.

दरम्यान, प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 154 फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT