Ghodganga Employee Agitation Sarkarnama
पुणे

Ghodganga Sakhar Karkhana : चर्चेला तयार पण मागण्यांवर ठाम; आंदोलनाच्या ५१ व्या दिवशीही कामगारांची भूमिका कायम

Ghodganga Sugar Factory Employee Agitation : कामगारांचे आंदोलन आणि एफआरपीबाबत मिळालेली नोटीसीमुळे कारखान्यापुढील पेच वाढला

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्यातील शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारख्यान्यातील कामगारांच्या आंदोलनावर ५१ दिवसांनंतरही तोडगा निघाला नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, मात्र रखडलेल्या २५ कोटी रुपयांच्या पगारातील ५० टक्के पगार मिळावा, या मागणीवर ठाम असल्याचे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले आहे. पगार रखडल्याने गेल्या वर्षभरापासून घोडगंगा साखर कारखान्याच्या कामगरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि कारखाना व्यवस्थापन काय निर्णय घेणार, याकडे तालुक्यातील कामगारांसह शेतकऱ्यांचेही लक्ष आहे. (Latest Political News)

घोडगंगा साखर कारखान्यातील कामगारांचे कामबंद आंदोलनास सोमवारी ५१ पूर्ण झाले. यानिमित्त कामगारांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कारखान्याने दहा महिने कामगारांचे पगार केले नसल्याने आंदोलनाची वेळ आली. आता आंदोलनासह दोन महिने पूर्ण होत आले आहेत. या काळात कुटुंबाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाल्याचे कामगार नेते महादेव मचाले यांनी सांगितले. ते म्हणाले, "कारखाना व्यवस्थानाशी आम्ही समोरसमोर बसून चर्चेला तयार आहोत, पण रखडलेल्या पगारातील ५० टक्के रक्कम मिळावी. यामुळे कामगारांनी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे."

वर्षभर पगार रखडल्याने कामगारांनी जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कामगारांसह शेतकऱ्यांचेही नुकसान होते असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. पवारांनी साखर आयुक्तांसह कारखाना व्यवस्थापन, कामगारांची एकत्रित बैठक घेऊन १० टक्के रकमे दिली जावी. तसेच उर्वरित रक्कमेची ठेवी करून त्याचे व्याज टप्प्याटप्प्याने कामगारांना द्यावे, असा प्रस्ताव ठेवला. पवारांनी दिलेला प्रस्ताव कामगारांविरोधी असल्याचा आरोप करून आंदोलकांनी तो फेटाळला.

कष्टाचे पैसे मिळत नसताना त्यावर तोडगा काढायचे सोडून कारखाना बंदचे खापर आंदोलनकांवर फोडले जात असल्याने कामगार आक्रमक झाले आहेत. व्यावस्थापनाने त्यांच्या चुका आमच्या माथी मारू नये असा इशाराही कामगारांच्या वतीने महादेव मचाले, तात्यासाहेब शेलार, नानासाहेब मासाळ यांनी दिला आहे.

"आम्ही मागण्यांबाबत ठाम आहोत. घोडगंगा साखर कारखाना कामगारांची माता आहे. कामगार कारखाना बंद पाडणार आहेत, हा होणार आरोप योग्य नाही. तुमच्या चुका आमच्या माथी मारु नका. कामगारांचा पगार वर्षभर द्या, कारखाना दुरुस्तीचे साहित्य द्या, वेळेत कारखाना सुरू करु. मात्र समस्या सोडवण्याऐवजी कामगारांवर आरोप करायचे, हे बरोबर नाही. यापुढे कामगार उधारीवर काम करणार नाही", असा इशाराही मचाले, शेलार आणि मासाळ यांनी दिला आहे.

आंदोलक कामगारांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे कारखाना व्यवस्थापनापुढील पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे कामगारांचे आंदोलन आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची रखडलेली एफआरपीमुळे कारखान्याला साखर आयुक्तांनी नोटीस पाठवली आहे. या अडचणीत अडकलेला कारखान्याला व्यवस्थापन कसे बाहेर काढणार, याबाबत तालुक्यात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT