Harshvardhan Patil Sarkarnama
पुणे

Harshvardhan Patil Vs Ajit Pawar : इंदापुरात लढाई आरपारची? लोकसभेआधीच हर्षवर्धन पाटलांची विधानसभेची तयारी

राजकुमार थोरात - Sarkarnama

Indapur Political News : लोकसभा निवडणुकाचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही आताच भाजपने इंदापुरात विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. सणसर येथील मेळाव्यात त्यांनी २०२४ च्या विधानसभेची निवडणूक आरपारची लढाई होणार असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांना मरगळ झटकण्याचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. पाटलांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बेबनाव वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

इंदापूरातील (Indapur) सणसर येथील संकल्प २०२४, संकल्प महाविजयाच्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. ते म्हणाले, आता होणारी विधानसभेची निवडणूक ही आरपार असणार आहे. ती माझी वैयक्तिक नसून जनतेच्या स्वाभिमानाची आहे. विधानसभेला महाविजय साजरा करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन पाटलांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंदापूर तालुक्यात ही विधानसभेला भाजपचा आमदार झाला पाहिजे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे लागेल. आता तालुक्यातील जनतेवर अन्याय होत असून आम्हालाही फिरु न देण्याच्या धमक्या येतात. त्यामुळे आपल्याला ही गुंडगिरी नष्ट करायची आहे, असे म्हणत पाटलांनी (Harshvardhan Patil) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

गेल्या दहा वर्षांमध्ये तालुक्यामध्ये एकही नव्याने उद्योगधंदा सुरू झाला नाही. ना नवे हायस्कूल ना कुठली संस्था सुरू झाली. सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ठ आहे. सणसर कटमधून दहा वर्षांत पाण्याचा थेंबही आले नाही, असे म्हणत पाटलांनी इंदापूरची अधोगती झाल्याची टीका केली. (Latest Political News)

'त्यांना' नारळ फोडण्याची घाई

इंदापूरमध्ये युतीचे सरकार असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तावशीच्या पुलासह सणसहच्या रस्त्यासाठी ४२ केाटींच्या निधी मंजूर केला होता. मात्र काहीही संबंध नसताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना नारळ फोडण्याची घाई झाल्याचा टोलाही पाटलांनी नाव न घेता आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) यांना लगावला.

छत्रपतीच्या दुरवस्थेस जाबाबदार कोण?

भवानीनगर येतील छत्रपती कारखान्याच्या उभारणीत जाचक, घोलप, चोपडे, निंबाळकर यांच्यासह अनेक कुंटुंबाचा सहभाग होता. सध्या छत्रपती कारखान्याची दुरवस्था झाली आहे. चुकीची कामगार भरती झाल्यानेच कारखान्याच्या अधोगतीला सुरुवात झाली. कारखान्याच्या या अवस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्न हर्षवर्धन पाटलांनी उपस्थित केला.

यावेळी भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील (Ankita Patil), तालुका अध्यक्ष अॅड. शरद जामदार, अविनाश मोटे, मुरलीधर निंबाळकर, तानाजी थोरात, करणसिंह घोलप, तुकाराम काळे, शिवाजी निंबाळकर, संतोष चव्हाण, मनोज पवार, नानासाहेब निंबाळकर, लालासाहेब सपकळ, तानाजी निंबाळकर आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT